
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना होणारा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नगर परिषदेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी दिलेल्या ठेकेदाराच्या कामात गंभीर अनियमितता असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केला आहे. ठेकेदार काही विशिष्ट लोकांची जनावरे पकडून ती पुन्हा पिंजऱ्यातून सोडून देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील घासबाजार, देवी गल्ली यासह इतर भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेने एका ठेकेदाराला काम दिले आहे. मात्र, ठेकेदाराकडून या कामात अनियमितता केली जात असल्याचा आरोप बजरंग दलाने केला आहे. काही जनावरे पकडल्यानंतर ती पुन्हा बेकायदेशीररीत्या सोडून दिली जातात, ज्यामुळे ही समस्या पुन्हा निर्माण होते, असे तक्रारीत म्हटले आहे. ठेकेदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्याचा ठेका तात्काळ रद्द करावा, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे.

याप्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. विशाल वाकचौरे, प्रशांत बेल्हेकर, सुरेश कालडा, श्लोक मुळे, साईप्रसाद सस्कर, गणेश खोबरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या आरोपामुळे नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर नगर परिषद काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


