महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या सत्ताधारी आमदाराचा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलेली ही ‘गुंडगिरी’ आणि ‘असंस्कृतपणा’ राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारा असून, अशा प्रवृत्तींना वेळीच रोखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून रविवारी संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या पुस्तकाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तांबे व थोरात बोलत होत्या.
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, संबंधित आमदाराने केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्राने एकजुटीने निषेध केला पाहिजे. अशा असभ्य आणि गुंड प्रवृत्तीचे लोक विधिमंडळासारख्या पवित्र सभागृहात पोहोचतातच कसे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित आमदाराचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली. बहुजन समाजात बुद्धिमान लोक नाहीत, असा चुकीचा संदेश देण्यासाठी काही विशिष्ट प्रवृत्ती जाणीवपूर्वक इतिहास बदलण्याचे षडयंत्र रचत असून या विरोधात त्यांनी सर्वसामान्य जनतेला आता जागरूक होण्याचे आवाहन केले आहे.
दुसरीकडे, डॉ. जयश्रीताई थोरात यांनी देखील सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असल्याचे सांगत त्यांनी महाराजांच्या महानतेवर प्रकाश टाकला. महाराजांना जर आणखी दहा वर्षांचे आयुष्य लाभले असते, तर त्यांनी संपूर्ण जगावर राज्य केले असते, इतकी ताकद त्यांच्या विचारात होती, असे त्या म्हणाल्या. महाराजांनी दिलेला महिलांचा सन्मान आणि समानतेचा विचार आज पायदळी तुडवला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ज्यांनी शिवरायांचे विचार कधी आत्मसात केले नाहीत, तेच लोक आज काहीही बरळत असून महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचे काम करत आहेत. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात अजिबात थारा देऊ नका, असे आवाहन करत महाराजांचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे डॉ. थोरात यांनी ठामपणे मांडले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, छात्रभारतीचे अनिकेत घुले, प्रा. बाबा खरात, विलास कवडे, सोमेश्वर दिवटे, राम अरगडे, राजा आवसक, ॲड. समीर लामखेडे, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी, गजेंद्र अभंग, विनोद राऊत, विजय पवार, प्रमिला अभंग, अमोल शेलकर, मोहसीन शेख, अशोक सातपुते, विजय सातपुते, रोहिणी गुंजाळ, विजय उदावंत, प्रकाश कडलग यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, दलित पॅंथर, अनिस, छात्रभारती, आरपीआय, विद्यार्थी सेना, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सत्यशोधक विचार मंच, समता विचार मंच यांसह विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विचारांसाठी संगमनेरकर रस्त्यावर एकवटले- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा सुसंस्कृत विचारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. समतेचा आणि प्रगतीचा विचार घेऊन या तालुक्याने कायम राज्याला दिशा दिली आहे. नेहरू गार्डन येथे सामूहिक वाचन झाल्यानंतर हजारो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत भव्य रॅली काढली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे महाराजांना अभिवादन करण्यात आले याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यात आले.







