दलित, शोषितांचा आपल्या साहित्यातून आवाज बुलंद करणारे आणि हक्कांसाठी लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून मोठी क्रांती केली आहे. त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून संगमनेर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अद्यावत स्मारक लवकरात लवकर साकारण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर मातंग एकता समाज व सकल मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्तही त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना डॉ. तांबे यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे योगदान राहिले असून त्यांनी बहुजन समाजाच्या न्याय-हक्कासाठी संघर्ष केला. अण्णाभाऊंचे समता व मानवतेचे विचार आपल्या राज्यघटनेत समाविष्ट आहेत.
संगमनेर शहरात बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे स्मारक साकारत असून, त्याच धर्तीवर अण्णाभाऊ साठे यांचेही अद्यावत स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी नगरपालिकेच्यावतीने जागाही निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मातंग एकता आंदोलनाचे अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर राक्षे यांनी अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी सर्वांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले, तसेच समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षण घेऊन विकासासाठी योगदान देण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमात प्रा. बाबा खरात यांनी अण्णाभाऊ साठे यांची विविध गीते सादर केली. या कार्यक्रमाला नगरसेवक गजेंद्र अभंग, उत्तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रदीप पाटील, नितीन अभंग, संतोष गायकवाड, जीवन पंचारिया यांच्यासह विविध पक्षांचे, पुरोगामी संघटनांचे आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातही अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान : बाळासाहेब थोरात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या सशक्त लेखणीतून कष्टकरी, श्रमिक आणि वंचितांच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यांनी ‘फकीरा’ या जगप्रसिद्ध कादंबरीसह ३५ कादंबऱ्या आणि ३०० हून अधिक कथांचे लेखन केले. त्यांचे साहित्य केवळ मराठीपुरते मर्यादित न राहता १४ भारतीय भाषांसह जर्मन, इंग्रजी, पोलिश आणि रशियन यांसारख्या परकीय भाषांमध्येही भाषांतरित झाले आहे. अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार महाराष्ट्रातील तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान अतुलनीय असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.