महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास आणि त्यांचे सर्वसमावेशक विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. संगमनेरच्या सय्यद बाबा चौकात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, मात्र याचवेळी आंदोलकांनी गायकवाड यांचे उपरोधिक आभार मानल्याने या विषयाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
वंचित बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सोमवारी सायंकाळी संगमनेर येथील बहुचर्चित ठरलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाचन चळवळीतून इतिहासाचा जागर करण्यात आला.
सय्यद बाबा चौकात आयोजित या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कॉम्रेड पानसरे यांच्या पुस्तकातील महत्त्वाच्या अंशांचे वाचन करण्यात आले. शिवरायांचे स्वराज्य हे केवळ एका धर्माचे नसून ते रयतेचे राज्य होते आणि त्यांच्या सैन्यात सर्वधर्मीय मावळे खांद्याला खांदा लावून लढले, हा विचार यावेळी मांडण्यात आला. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत महापुरुषांचा इतिहास हा अफवांवरून नव्हे तर अस्सल पुराव्यांवर आधारित साहित्यातूनच समजून घेतला पाहिजे, असा सूर आळवला. महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे काळाची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी एक वेगळीच भूमिका मांडली. आमदार गायकवाड यांनी या पुस्तकाला विरोध केल्यामुळे आणि त्यावर आक्षेप घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये या पुस्तकाविषयी मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. जे पुस्तक अनेकांनी वाचले नव्हते, ते आता गायकवाडांच्या विरोधामुळे शोधून वाचले जात आहे. पुस्तकाचा खप मोठ्या प्रमाणावर वाढला असून लोक आता स्वतःहून खरा इतिहास जाणून घेण्यासाठी पुढे येत आहेत. गायकवाड यांनी अजाणतेपणी का होईना, पण या पुस्तकाची मोठी जाहिरातच केली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असा उपरोधिक टोला यावेळी कार्यकर्त्यांनी लगावला.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे तर स्थानिक मुस्लिम बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवरायांचे विचार हे समाजाला तोडणारे नसून जोडणारे आहेत, हेच या सर्वधर्मीय उपस्थितीवरून दिसून आले.
या जाहीर वाचन कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, तालुका व शहर स्तरावरील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने संदीप मोकळ, गोरख जगताप, अजिजभाई ओहरा, ॲड. नइम इनामदार, ॲड. कॉम्रेड ज्ञानदेव सहाने, बाबा मोकळ, दत्ता ढगे, रजत अवसक, आवेज खान, आनिस शेख, शकील पेंटर आणि सलिम बागवान यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.






