पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, फार्मर आयडी आणि ई-केवायसी (e-KYC) कामासाठी संगमनेर तहसील कार्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून ई-केवायसी डेस्कवरील संबंधित कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांना तासंनतास ताटकळत राहावे लागत असून त्यांची कामे प्रलंबित राहत आहेत. ही गैरसोय तातडीने न थांबल्यास तहसील कार्यालयासमोर तीव्र ‘घंटानाद आंदोलन’ छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ६० ते ७० वयाचे शेतकरी दररोज तहसील कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र, या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडे अकोले येथील अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. कर्मचारी जागेवर उपलब्ध नसल्यामुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
तहसील कार्यालयातील ई-केवायसी व फार्मर आयडी डेस्कसाठी तातडीने पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अतिरिक्त चार्जचा पर्याय शोधून काम सुरळीत करावे आणि प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण कराव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या गंभीर समस्येवर प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा होणाऱ्या तीव्र आंदोलनाला व परिणामांना प्रशासनच जबाबदार असेल, असे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.
तालुकाध्यक्ष संपतराव कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष आजिज ओहरा, तालुका महासचिव बाबासाहेब मोकळ, तालुका सचिव संदीपराव भोसले आणि युवा शहराध्यक्ष अरबाज शेख यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.