महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’चा स्वयंघोषित भोंदू बाबा राजेंद्र बापू गडगे याच्या पोलीस कोठडीत संगमनेर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली असून आता तो २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.
स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून आणि असाध्य आजार बरे करण्याचे खोटे आमिष दाखवून अनेक निष्पाप नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे या प्रकरणी तपास करत आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी गडगे याच्या आश्रम आणि निवासस्थानी दोनदा झाडाझडती घेतली असून, त्यातून पोलिसांच्या हाती सुमारे २०० हून अधिक व्हिडिओ लागले आहेत. या व्हिडिओमधून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पोलिसांनी एक आलिशान गाडी, महत्त्वाची कागदपत्रे आणि संशयास्पद साहित्य देखील जप्त केले आहे.
या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि फसवणुकीचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गडगे याची कोठडी वाढवली आहे, तर याच प्रकरणातील दुसरा आरोपी मधुकर शिंदे याला मात्र न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक मुख्य सूत्रधार असलेला डॉ. मोहन पुरी, गडगे याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे आणि सूरज शिंदे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. तांत्रिक अडचणी आणि सखोल तपासाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने ही कोठडी वाढवून दिली असून, या कारवाईमुळे भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून संगमनेरमधील सोनांबेकर हॉस्पिटलचे अजिंक्य सोनांबेकर व अभिजीत कोरडे या दोघा डॉक्टरांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ थेट माध्यमांवर ‘मीडिया ट्रायल’चे आरोप डॉक्टरांच्या एका संघटनेकडून करण्यात आले. मात्र भोंदू बाबाच्या या प्रकरणांमध्ये डॉ. मोहन पुरी या आपल्या वैद्यकीय व्यवसायिकाचे नाव प्रमुख सूत्रधार म्हणून समोर आले असल्याने प्रकरणी संगमनेरातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेने अद्याप साधा निषेध देखील न केल्याने डॉक्टरांच्या संघटनांच्या भूमिकेविषयी जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.






