अकोले, प्रतिनिधी:
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रसिद्ध रंधा धबधबा प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे.

भंडारदरा धरणातील पाणीसाठा आज ७४४१ दशलक्ष घनफूट (६७.४१%) झाला आहे. जलाशय परिचालन सूचीनुसार पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, भंडारदरा धरणातून विद्युतगृहामार्फत ८४५ क्युसेक तर सांडव्याच्या (स्पील वे) गेटमधून १०५८ क्युसेक, असे एकूण १९०३ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक कमी-जास्त झाल्यास विसर्ग कमी-जास्त केला जाईल, असे शाखा अभियंता प्रवीण भांगरे यांनी सांगितले. येत्या १५ जुलैपर्यंत धरणाची पाणीपातळी ६५% राखण्यात येणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा चांगला जोर होता. पंधरा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आता थांबेल असे वाटत असतानाच, सकाळपासून पुन्हा पावसाने कमी-जास्त प्रमाणात जोर धरला आहे. गत २४ तासांत भंडारदरा येथे ३० मिमी, घाटघर येथे ७४ मिमी, रतनवाडी येथे ६६ मिमी तर पांजरे येथे ५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या सततच्या पावसामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

धरणातून पाणी सोडल्याने रंधा धबधबा प्रथमच पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारदरा धरणातून सोडलेलं पाणी निळवंडे धरणात जमा होत असून सध्या निळवंडे धरणातून शेती सिंचनासाठी ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे प्रवरा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. तसेच, आढळा नदीवरील देवठाण धरण पूर्ण भरले असून, आढळा नदीपात्रातील पाण्याची पातळीही वाढली आहे. हे पाणी प्रवरा नदीला मिळणार आहे.
दरम्यान, मुळा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे आणि मुळा धरणातही चांगला पाणीसाठा जमा होत आहे. मात्र, आदिवासी भागातील भातखाचरे पाण्याने भरल्यामुळे रोपे पाण्याखाली गेली आहेत, यामुळे पेरणीला उशीर होत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे बांध फुटले आहेत, ज्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. रोपे खराब झाल्यास भात लागवड कशी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.


