
संगमनेर, प्रतिनिधी:
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्यासह अनेकांनी याप्रसंगी पांडुरंगाच्या चरणी महाराष्ट्राच्या सुख-समृद्धी, बंधुभाव आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली. आषाढी वारीची परंपरा ही मानवतेला साद घालणारी असून, ‘महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म’ असल्याचा विचार यावेळी मांडण्यात आला.
चैतन्य नगर येथील विठ्ठल मंदिरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती आणि पूजा करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, वैष्णव मुर्तडक, नाना देशमुख, सुभाष ताजने, श्याम अभंग, नितीन अभंग, डॉ. निलेश सातपुते, बाबा मंडलिक, सौरभ कोल्हे, रामनाथ अभंग, गजेंद्र अभंग, मिलिंद औटी, प्रमिला अभंग, रवींद्र बडे, सुदर्शन पलोड, जीवन पंचारिया, आशिष कोठवळ, प्रशांत अभंग, दत्ता चव्हाण, सतीश बोरकर, राहुल चौधरी, आलोक बर्डे, विशाल ढोले, समीर भोर, मयूर राऊळ आदींसह संगमनेरमधील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आषाढी एकादशीच्या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून वारकरी संप्रदायाने बंधुभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे. वारीमध्ये सर्व मतभेद विसरून एकत्र पायी चालत जातात. महिनाभर महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरीची वाट चालत असतात आणि कळसाचे दर्शन जरी झाले तरी हे सर्व वारकरी आनंद मानतात.
हा आनंद घेऊन वर्षभर जीवनात उत्साहाने काम करतात. ही महाराष्ट्राची आदर्श परंपरा असून मानवतेला साद घालणारी एक आगळी-वेगळी तिची वैशिष्ट्ये आहेत. मागील एक महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय झाला असून, यावर्षी राज्यात सर्व नागरिकांना सुख-समृद्धी लाभू दे, बंधुभाव नांदू दे आणि भरपूर पाऊस पडून राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाच्या चरणी केली.”
आमदार सत्यजित तांबे यांनी महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे. हा मानवतेचा धर्म जपण्याचे विचार साधुसंत व महात्म्यांनी दिले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, चोखामेळा अशी थोर परंपरा वारकरी संप्रदायाची असून, सामान्य माणसाला विचारांतून ज्ञान देण्याचे काम या संतांनी केले आहे. सर्व धर्म समभावाचा हा विचार पुढे नेण्यासाठी काम करावे, असे आवाहन केले.
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी आषाढी वारीला महाराष्ट्राचा आनंद सोहळा असे संबोधले. त्या म्हणाल्या, लाखो वारकरी देवाच्या दर्शनाला जातात, हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहाने सर्वत्र आषाढी एकादशी साजरी केली जात आहे. हे भक्तीचे पर्व असून प्रार्थना आणि उपवासाने परमेश्वराजवळ जाता येते. टाळ-मृदंगाच्या गजरात होणारा हरिनामाचा गजर हा प्रत्येकासाठी सुखद क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.
संगमनेरमधील विविध गावे आणि शहरामध्ये टाळ मृदंगाच्या गजरात नागरिकांनी आषाढी एकादशी साजरी केली. तसेच, तालुक्यातील विविध विद्यालयांमधून आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आषाढी वारीचे दर्शन घडवले. एकूणच, हा दिवस संगमनेरकरांसाठी भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोपा दर्शवणारा ठरला.






