महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर:
सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत, त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे, देश जर महासत्ता करायचा असेल, तर आधी गाव आणि शेतकरी समृद्ध करणे गरजेचे असून आपले गाव हेच आपले खरे तीर्थक्षेत्र मानले पाहिजे, असे प्रतिपादन पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
संगमनेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील शनिवारच्या व्याख्यानात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात पेरे पाटील यांनी अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण, बालविवाह, भ्रष्टाचार आणि ग्रामविकास यांसारख्या गंभीर विषयांवर अत्यंत रोखठोक भाषेत विचार मांडले.
सध्या बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून धने, जिरे, हळद, तिखट, जवस तसेच खाद्यतेलांमध्येही भेसळीचे प्रकार वाढले आहेत. या भेसळयुक्त अन्नाचा मानवी आरोग्यावर भयंकर परिणाम होत असल्याने, विशेषतः महिलांनी याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. यासोबतच, प्लास्टिक जाळू नका आणि गावाच्या पर्यावरणासाठी वडाची झाडे लावा, असा सल्ला दिला. वडाचे झाड स्वतःचेच असावे, दुसऱ्याच्या वडाची पूजा करण्यापेक्षा स्वतः झाडे लावून ती जगवावीत, असे ते म्हणाले.
दारूच्या व्यसनामुळे अनेक सुखी कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली. व्यसनमुक्त गाव हेच समृद्ध गाव बनू शकते, त्यामुळे हरिपाठ, सत्संग आणि सातत्यपूर्ण जनजागृतीच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन त्यांनी केले. गावाचा विकास करायचा असेल तर आधी विचार बदलणे गरजेचे आहे.
भ्रष्टाचारापासून दूर राहून प्रामाणिकपणे काम केल्यास समाज त्याची निश्चित दखल घेतो, असे सांगताना त्यांनी पाटोदा गावात राबविलेल्या उपक्रमांचे दाखले दिले. पाटोद्यात ४२ सीसीटीव्ही कॅमेरे, निराधारांसाठी मोफत भोजन, मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि दररोज सकाळी राष्ट्रगीत घेण्याचा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
कार्यक्रमात बोलताना त्यांनी अकोले तालुक्यातील अल्पवयीन विवाहांबाबत चिंता व्यक्त केली आणि ग्रामपंचायतींनी या अनिष्ट प्रथेविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. लोकांना लुबाडू नका किंवा त्यांचे रक्त पिऊ नका, असा सल्ला देत तरुणांना उद्देशून त्यांनी, ‘कलेक्टर होता येत नसेल तर कलेक्टरचा बाप व्हा’ असा मार्मिक व दिशादर्शक संदेश दिला. पती दारू पिऊन आल्यास दार उघडू नका; महिलांना मिश्कील सल्ला व्यसनमुक्तीमध्ये महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असल्याचे सांगताना भास्करराव पेरे पाटील यांनी उपस्थितांना आपल्या खास शैलीत एक अजब सल्ला दिला. पती दारू पिऊन घरी आला तर घराचे दार उघडू नका, अशी ठाम भूमिका महिलांनी घ्यावी असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, ‘महिलांनो, तुम्हीच दारू प्यायला सुरुवात करा, मग पुरुषांना त्याचे दुष्परिणाम समजतील’ अशी मिश्कील टिप्पणी करताच एकच हशा पिकला. त्यांच्या या विधानामध्ये उपरोधाचा भाग असला, तरी दारूच्या व्यसना विरोधात महिलांनी आता अत्यंत आक्रमक आणि ठाम होण्याची गरज आहे, हाच गंभीर संदेश त्यामागे होता.