


महाराष्ट्र संवाद न्यूज- पंढरपूर:
आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक शासकीय महापूजा केली. पहाटे ३ वाजता ही महापूजा पार पडली, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा देखील उपस्थित होत्या.
महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासह आणि नाशिक येथील मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्यासह रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आणि दुग्धाभिषेक केला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच राज्याच्या विकासासाठी विठ्ठल-रुक्मिणी चरणी प्रार्थना केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या वर्षी नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे कैलास आणि कल्पना उगले हे दाम्पत्य मानाचे वारकरी ठरले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. हरिनामाच्या गजराने दुमदुमलेल्या पंढरपुरात, राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांनी आषाढी एकादशीचा आनंदोत्सव साजरा केला. ८०० वर्षांहून अधिक परंपरा असलेली ही वारी “माऊली माऊली” आणि “ग्यानबा तुकाराम” च्या गजरात विठ्ठलाच्या भेटीसाठी आली होती.



