


संगमनेर, प्रतिनिधी:
भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे प्रवरा, आढळा आणि म्हाळुंगी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अमृतवाहिनी प्रवरा नदीला आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पूजन करत आरती केली.
प्रवरानदीच्या गंगामाई घाटावर हा सोहळा पार पडला. यावेळी प्रवरा नदीचे विधिवत जलपूजन आणि आरती करण्यात आली, तर म्हाळुंगी नदीला साडी-चोळी अर्पण करण्यात आली. या प्रसंगी डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिली तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्यासह गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, अजित काकडे, प्रमिला अभंग, ॲड. मुन्ना कडलग, चंद्रकांत कडलग, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, सुमित पवार, आदित्य बर्गे, चंद्रकांत काळण, एकनाथ श्रीपत, प्रीती फटांगरे, मिलिंद औटी, सुषमा भालेराव, सुनीता कांदळकर आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी उत्साहात पूजा करून प्रवरा नदीला दिवे अर्पण केले. यावेळी संगमनेरमधील विविध पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक, पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यात आनंद’ – डॉ. सुधीर तांबे
यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी प्रवरा नदीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृतीत नदीला पवित्र स्थान दिले आहे आणि तिला ‘आई’ मानले जाते. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे धरण पूर्ण झाले आणि दोन्ही बाजूंना कालवे निर्माण झाले, ज्यामुळे आता नदी आणि कालव्यांमधून पाणी येत असल्याने समृद्धी वाढली आहे. भंडारदरा आणि निळवंडे मिळून सुमारे 20 TMC (दशलक्ष घनफूट) पाणी उपलब्ध होत असल्याने सर्व शेतकरी आनंदी असल्याचे तांबे यांनी नमूद केले. संगमनेर शहरातील नागरिकांसाठी दुथडी भरलेले पाणी पाहणे हा अत्यंत आनंददायी क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘संगमनेरची संस्कृती एकतेची, समानतेची’ – डॉ. जयश्री थोरात
डॉ. जयश्री थोरात यांनी प्रवरा नदीचा संगमनेर शहराच्या सांस्कृतिक वारशाशी संबंध जोडला. त्या म्हणाल्या, रतनवाडी येथील अमृतेश्वरपासून उगम पावणारी आपली प्रवरा नदी पुढे मोठी होत जाऊन समुद्राला मिळते. पाच नद्यांच्या संगमामुळे शहराला ‘संगमनेर’ हे नाव मिळाले आहे. संगमनेरची संस्कृती सुसंस्कृत असून, या संस्कृतीचा आपणा सर्वांना अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येक विभागाची संस्कृती घेऊन प्रवरा नदी समुद्राशी एकरूप होते, तसेच संगमनेरची ही संस्कृती एकतेची आणि समानतेची असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. नदीला आई मानून दरवर्षी मोठ्या आनंदाने तिचे पूजन केले जाते आणि आजचा हा क्षण संगमनेरमधील नागरिकांसाठी मोठा आनंदाचा असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
‘बाळासाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेर वैभवशाली’ – सोमेश्वर दिवटे
काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या योगदानाला उजाळा दिला. संगमनेर शहराची विकासकामे, शहरासाठीची थेट पाईपलाईन आणि गंगामाई घाटाचे सुशोभीकरण यासह विविध कामे बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केल्यामुळे संगमनेर हे वैभवशाली शहर निर्माण झाले.





