

संगमनेर, प्रतिनिधी:
जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित उत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने येणाऱ्या साई भक्तांच्या सेवेसाठी कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी संगमनेर ते शिर्डी पायी दिंडीत सक्रिय सहभाग घेतला. या दिंडीदरम्यान डॉ. थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना सेवा पुरवली.
पुणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागातून संगमनेरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या अनेक दिंड्यांसोबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली. या दिंडीत डॉ. जयश्री थोरात यांनी स्वतः पायी चालत, साई भजने गात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, त्यांनी साई भक्तांना प्रसाद वाटप, आरोग्य तपासणी आणि इतर आवश्यक व्यवस्थांमध्येही सक्रिय योगदान दिले.
यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, श्रद्धा आणि सबुरीचे प्रतीक असलेले साईबाबा हे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. संगमनेर तालुक्यासह राज्यभरातील लाखो भक्तांची साईबाबांवर अलोट श्रद्धा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत तीन दिवसांचा मोठा उत्सव असतो, यासाठी राज्यभरातून लाखो साईभक्त येत असतात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या साई भक्तांना विविध सुविधा पुरवल्या जातात.
पायी दिंडी ही महाराष्ट्राची एक मोठी संस्कृती आहे, जिथे कोणताही भेदभाव नसतो. सर्व धर्म समभाव जपत सर्वजण एकमेकांना ‘माऊली’ म्हणून हाक मारतात. आषाढी श्रावणाच्या सरी, रिमझिम पाऊस, सर्वत्र हिरवळ आणि साईनामाचा गजर असा हा सुंदर सोहळा जीवनातील एक अविस्मरणीय ठेवा आहे, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. दिंडीदरम्यान त्यांनी विविध ठिकाणी साई भक्तांना खिचडी आणि प्रसादाचे वाटप केले, तसेच अनेकांची आरोग्य तपासणी केली.
संगमनेरमधील युवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन शिर्डीतील उत्सवात येणाऱ्या साई भक्तांची सेवा केली.






यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की,