
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
मुंबई, विशेष प्रतिनिधी:
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयांचे महाघोटाळे आणि बोगस भरती झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे राज्य सरकारने मोठी कारवाई करत ट्रस्टचे सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली, तसेच दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांची अपसंपदा जप्त केली जाईल, असे स्पष्ट केले. देवाच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हा मुद्दा स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला होता. लंघे यांनी उघड केले की, ट्रस्टच्या विश्वस्तांनी बनावट ॲप्स तयार करून लाखो भाविकांकडून पूजेसाठी देणग्या स्वीकारल्या. तीन ते चार बनावट ॲप्सवर प्रत्येकी तीन ते चार लाख भाविकांनी पैसे पाठवल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, मोठ्या प्रमाणावर बोगस कर्मचाऱ्यांची भरती केल्याचा प्रकारही त्यांनी समोर आणला, ज्यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा त्यांनी केला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी तर हा घोटाळा ५०० कोटी रुपयांपर्यंत असून, विश्वस्त दर आठवड्याला कोट्यवधींच्या जमिनी खरेदी करत असल्याचा आरोप केला.

बनावट ॲप्सद्वारे भक्तांची फसवणूक, २४४७ बोगस कर्मचारी!
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सरकारी चौकशी समितीचा अहवाल सादर केला, यातील माहिती धक्कादायक होती. बनावट ॲप्सद्वारे जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्या विश्वस्तांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर असलेल्या बँक खात्यांमध्ये परस्पर जमा होत होत्या. सायबर सेलच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, ज्या मंदिरात पूर्वी केवळ २५८ कर्मचारी असताना कारभार सुरळीत चालत होता, त्याच ट्रस्टने २,४४७ कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, चौकशीत हे कर्मचारी प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचे आढळले.
घोटाळ्याची चौकशी बाहेरील अधिकाऱ्यांकडून; पंढरपूर, शिर्डीच्या धर्तीवर शासकीय समिती
या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, घोटाळेबाजांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी बाहेरच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल, कारण यापूर्वी धर्मादाय आयुक्तालयाच्या एका अधिकाऱ्याने या सर्व गैरव्यवहारांना क्लीन चिट दिली होती. चुकीचा अहवाल देणाऱ्या त्या अधिकाऱ्याचीही चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंढरपूर येथील विठ्ठल देवस्थान आणि शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या धर्तीवर शनि शिंगणापूर मंदिराच्या संचालनासाठी लवकरच शासकीय समिती स्थापन केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यासाठी विधिमंडळाने कायदा केलेला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, असे सांगत यापुढे मंदिरावर शासकीय नियंत्रण असेल असे संकेत त्यांनी दिले.

