

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
मुंबई, विशेष प्रतिनिधी:
उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भंडारदरा धरणाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीचा मुख्य उद्देश शताब्दी महोत्सवाचे नियोजन करणे, धरणाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुचवणे, आणि परिसरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधणे हा आहे.
भंडारदरा धरण, ज्याला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असेही नाव देण्यात आले आहे, या धरणाने अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, आणि नेवासा तालुक्यांतील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ केली आहे. यामुळे या भागातील कृषी, सहकार आणि आर्थिक विकासाला मोठे पाठबळ मिळाले आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने धरणाचे संवर्धन करण्यासोबतच या भागातील पर्यटन विकासाला गती देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या माध्यमातून रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याच उद्देशाने एक प्राथमिक आराखडा तयार केला जात आहे.
भंडारदरा जलाशयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे भंडारदरा जलाशयाचे संवर्धन आणि पर्यटन विकासाला अधिकचे पाठबळ मिळेल. -राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री.




