
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर
संगमनेर शहराच्या अस्मितेचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न आता प्रत्यक्ष कृती आराखड्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला असून, शहरवासीयांनी दिलेल्या कौलानुसार संगमनेर बसस्थानक परिसरात महाराजांचे भव्य ‘पूर्णाकृती अश्वारूढ स्मारक’ उभारले जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
या स्मारकाचा प्रवास संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा राहिला आहे. २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी बसस्थानक परिसरातील मोक्याची जागा स्मारकासाठी मिळावी, अशी अधिकृत मागणी करत या लढ्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव शासनदरबारी ताकदीने मांडला. मात्र, एसटी महामंडळाच्या धोरणानुसार बसस्थानक परिसरात स्मारके उभारण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने हा विषय दीर्घकाळ रखडला होता.
२०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून विशेष पाठपुरावा सुरू केला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेऊन, ही लोकभावनेची बाब असल्याचे पटवून दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत ‘विशेष बाब’ म्हणून बसस्थानक समोरील जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली. ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त संगमनेरकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत.
जागा निश्चित झाल्यानंतर स्मारकाच्या स्वरूपावरून संभ्रम निर्माण होऊ नये,यासाठी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने जनमत चाचणी घेण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. ५ ते ७ मार्च दरम्यान झालेल्या या मतदान प्रक्रियेत १२ हजारहून अधिक नागरिकांनी आपला हक्क बजावला.
काल जाहीर झालेल्या निकालानुसार, ६ हजार ५६४ नागरिकांनी अश्वारूढ स्मारकाला पहिली पसंती दिली, तर उभ्या स्मारकासाठी ४ हजार ७६१ आणि सिंहासनाधीश्वर स्मारकासाठी ७६१ मते पडली. या निकालाचा आदर करत नगरपालिकेने अश्वारूढ स्मारकाचा ठराव मंजूर केला.
आमदार सत्यजीत तांबे यांनी या स्मारकाच्या उभारणीबाबत माहिती देताना सांगितले की, या भव्य स्मारकासाठी अंदाजे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी केवळ शासकीय योजनांवर अवलंबून न राहता, लोकसहभागातून आणि शासनाच्या मदतीने उभा केला जाईल. सर्व संगमनेरकरांच्या सहभागातून हे स्मारक शहराच्या वैभवात भर घालणारे आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठराव मंजूर झाल्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असून शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.






