महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले
भंडारदरा धरणाच्या मागील बाजूकडील सर्व आदिवासी गावे आणि धरण भिंतीच्या पूर्व भागातील परिसराला शासकीय योजनेतून पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण सर्वेक्षणास अखेर सुरुवात झाली आहे.
किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेल्या लाँग मार्चमधील मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी अकोले तहसील कार्यालयात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा व सीटूच्या विविध संघटनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग नोंदवला, तर प्रांताधिकारी अरुण उंडे आणि तहसीलदार मोरे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
बैठकीत कोळेकर यांनी माहिती दिली की, लाँग मार्चमध्ये मान्य झालेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणाचे आदेश निर्गमित केले आहेत. जलसंपदा विभागाला याबाबतचे अधिकृत आदेश प्राप्त झाले असून, प्राथमिक सर्वेक्षणाचे काम येत्या आठवड्याभरात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पाणी प्रश्नासोबतच धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मुद्दाही या बैठकीत केंद्रस्थानी राहिला. भंडारदरा धरणासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला म्हणून मिळालेल्या जमिनी ‘वर्ग दोन’ ऐवजी ‘वर्ग एक’ मध्ये रूपांतरित करून त्यांना जमिनीचे पूर्ण मालकी हक्क देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
तसेच, अकोले तालुक्यातील घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी किसान सभेने दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या प्रकरणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, नवीन शासनादेशानुसार २०११ पूर्वीची अशी सर्व प्रकरणे निकाली काढून जमिनी संबंधितांच्या नावे करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कसत असलेल्या वन जमिनींच्या हक्काबाबतही बैठकीत महत्त्वपूर्ण प्रगती झाली. लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने सादर केलेल्या ९४८ प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी तातडीने सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक आणि बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन ते सोडवण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेण्यात आले. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत रतनवाडी आणि खडकी बुद्रुक येथे झालेल्या कामांमधील तक्रारींवरून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तसेच आंबेवंगण येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देण्याची मागणी आग्रहाने मांडण्यात आली.
या निर्णयामुळे भंडारदरा धरणाला १०० वर्षे पूर्ण होत असताना, हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना शेती आणि पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, याकडे किसान सभेच्या सातत्यपूर्ण लढ्याचे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.
या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजने, तुळशीराम कातोरे, हेमलता शेळके आणि संगीता साळवे यांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.






