

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
जे लोक स्वतः काहीही काम करत नाहीत, तेच चांगल्या कामांना विरोध करून जनतेची दिशाभूल करत आहेत, त्यांनी किती झाडे लावली अशी टीका करत सोशल मीडियाचा वापर करून इतरांबद्दल खोट्या गोष्टी पसरवून स्वतःची स्तुती केली जात आहे. देशभर काही पक्षांकडून असाच कार्यक्रम राबवला जात असल्याचे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मालदाड (संगमनेर) मायंबा डोंगर येथील श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर परिसरात जयहिंद लोकचळवळ आणि अमृत उद्योग समूहातर्फे आयोजित २० व्या ‘दंडकारण्य अभियाना’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सरपंच गोरख नवले, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, योगेश भालेराव, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांच्यासह अमृत उद्योग समूहाचे अनेक पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले, स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ‘झाडे लावणारा माणूस’ हे पुस्तक वाचून प्रेरणा घेतली आणि ‘दंडकारण्य अभियाना’ची सुरुवात केली. या अभियानामुळे संगमनेर तालुक्यात वृक्षारोपणाबाबत मोठी जागृती झाली आहे. अनेक बोडके डोंगर हिरवेगार झाले असून, या कामाची दखल देशपातळीवर घेतली गेली आहे.
सरपंच गोरख नवले यांनी मालदाडमध्ये ८५ एकर परिसरात वनराई फुलवून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे.
माजी मंत्री थोरात पुढे म्हणाले की, वृक्षारोपण आणि संवर्धन हे काम अत्यंत कठीण आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या, जनावरांपासून झाडांचे संरक्षण अशा अनेक अडचणी असूनही तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. आपण सर्वांनी मिळून हे काम पुढे न्यायचे आहे. निळवंडे धरण आणि कालव्यांच्या माध्यमातून आपण दुष्काळी भागाला पाणी दिले. यापुढेही पाण्याच्या योग्य वितरणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
माधवराव कानवडे म्हणाले, बाळासाहेब थोरातांनी तालुक्याच्या विकासासाठी खूप मेहनत घेतली आणि अनेक योजना राबवल्या. निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले, मात्र आता याचे श्रेय दुसरेच घेत आहेत. सतत २४ तास काम करणाऱ्या या नेत्याने तालुक्यासाठी काय कमी केले? तालुक्याच्या जनतेने मोठी चूक केली असून यापुढे ती पुन्हा करू नये. बाळासाहेब थोरात हे तालुक्याचा स्वाभिमान आणि अस्मिता आहेत. या सुसंस्कृत नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरपंच गोरख नवले यांनी स्वागत केले. दशरथ वर्पे यांनी प्रास्ताविक केले, तर योगेश भालेराव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. कार्यक्रमादरम्यान आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी विद्यार्थ्यांसोबत पर्यावरण संवर्धनाची गीते सादर करून वातावरणात उत्साह भरला.




थोरात म्हणाले,
सरपंच गोरख नवले यांनी स्वागत केले.