

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
नाशिक: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या एका जाहीर भाषणात अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या तिरंग्याऐवजी लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन करतानाच सर्वधर्म समभावाला ‘ढोंगीपणा’ म्हणत ‘भारत मातेच्या भविष्याशी केलेली प्रतारणा’ असं संबोधलं.
नाशिक दौऱ्यावर असताना राणेनगरमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने उभारलेल्या 51 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
‘भारतीय स्वातंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन’ या विषयावर बोलताना भिडे म्हणाले, “आपण तिरंगा आणि संविधान मानले पाहिजे, पण भगवा ध्वज हे हजारो वर्षांपासून देशाचे प्रतीक आहे. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी आपण काम करत राहू.” त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व स्वीकारून भगवा ध्वज लाल किल्ल्यावर फडकवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनही केलं.
आपण हिंदु राष्ट्रासाठी जगले पाहिजे आणि देव, देश, धर्मासाठी लढले पाहिजे, असं सांगत भिडे यांनी देशाची एकात्मता भगव्या झेंड्यामध्ये असल्याचं म्हटलं.
या वेळी त्यांनी ‘आंबा खाल्ल्याने मुले होतात’ या त्यांच्या जुन्या विधानाचा पुनरुच्चार केला. त्यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली आणि म्हणाले की या विधानामुळे त्यांच्यावर खटला सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल बोलताना भिडे यांनी महाराजांनी संघर्ष करणारा समाज निर्माण केला, असं सांगितलं. तसेच, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के याला ‘नालायक माणूस’ म्हणत त्याने ‘वतनासाठी शेण खाल्लं’ असं वादग्रस्त वक्तव्यही केलं. याव्यतिरिक्त, त्यांनी खग्रास ग्रहणाच्या वेळी मंत्रजप केल्यास त्या मंत्राची शक्ती मिळते, असाही दावा केला.



नाशिक दौऱ्यावर असताना राणेनगरमध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल बोलताना भिडे यांनी