

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर, प्रतिनिधी:
शहरातील परदेशपुरा परिसरात एका १७ वर्षीय मुलाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्रातील तंत्रज्ञ सुहास रामचंद्र वाघमारे (वय ५३) यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री घडली असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
या घटनेनंतर संगमनेर शहरात अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुहास वाघमारे हे मूळचे सांगलीचे असून, कामामुळे ते संगमनेरमध्ये राहत होते. घटनेच्या रात्री ते परदेशपुरा येथील देशी दारूच्या दुकानासमोरून जात असताना एका १७ वर्षीय मुलाने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.
वाघमारे यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा तरुण नशेत असल्याने त्याचा राग अनावर झाला आणि त्याने वाघमारे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रात्रीची वेळ असल्याने तिथे कोणीही मदतीला नव्हते. या संधीचा फायदा घेत तरुणाने वाघमारे यांच्या डोक्यात अनेकवेळा दगड मारले, ज्यामुळे ते रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वाघमारे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पोलिसांना मारहाण करणाऱ्या तरुणाची ओळख पटली. तो अल्पवयीन असला तरी, त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी तातडीने तपास करत तरुणाला शहरातील मेनरोड परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस कॉ. अजित कुर्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या १७ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे संगमनेर शहरातील अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील गुंजाळवाडी रोड, नाशिक पुणे महामार्ग, परदेशपुरा, आणि अकोलेनाका यांसारख्या परिसरात अल्पवयीन मुलांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्या चैन स्नॅचिंग, मोबाईल चोरी, डिझेल चोरी आणि रस्त्याने जाणाऱ्या लोकांना अडवून पैसे लुटणे यांसारखे गुन्हे करत आहेत. यामुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. केवळ गुन्हेगारांवर कारवाई न करता, या अल्पवयीन मुलांच्या व्यसनाधीनतेच्या मुळाशी जाऊन सामाजिक आणि शैक्षणिक उपाययोजना करणेही आवश्यक आहे, असे शहरातील सुज्ञ नागरिक बोलत आहेत. या घटनेमुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण झाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.





या घटनेनंतर संगमनेर शहरात अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी तातडीने तपास करत तरुणाला शहरातील मेनरोड परिसरातून ताब्यात घेतले.