

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
नेवासा फाटा येथील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नेवासा फाटा परिसरातील ‘कालिका फर्निचर’ या दुकानाला रविवारी रात्री उशिरा आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दुकानाच्या मागील बाजूला राहत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मयूर अरुण रासने (वय ३६), त्यांची पत्नी पायल (वय ३०), मुले अंश (वय ११) आणि चैतन्य (वय ६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५) यांचा समावेश आहे. सुदैवाने, मयूर यांचे आई-वडील बाहेरगावी गेल्याने ते बचावले आहेत.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर, गाद्या आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.
स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि अग्निशमन दलालाही पाचारण केले. पण आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, आत अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढणे शक्य झाले नाही. या दुर्दैवी घटनेनंतर व्यावसायिक ठिकाणी अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे दुकानांमध्ये अग्निशमन यंत्रणा अनिवार्य करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.



आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण
