संगमनेर:
तालुक्यातील तिगाव येथे शुक्रवारी (२२ मे) सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातीलच एका दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
महेश गोरक्षनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय १४) अशी मृत्यू झालेल्या दोन तरुण भावांची नावे आहेत. एकाच घरातील दोन सख्या भावांचा असा अचानक अंत झाल्यामुळे सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण तिगाव परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने तिगाव परिसरातील एका मोठ्या दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी परिसरातील मुलांची नेहमी वर्दळ असते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश आणि ओंकार हे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या खाणीवर गेले होते. मात्र, खाणीतील पाण्याच्या खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडू लागले. पाण्यात बुडत असताना एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही जागीच अंत झाला.
या घटनेची माहिती मिळताच तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत शिताफीने दोन्ही भावांना पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच दोघांना ‘मृत घोषित’ केले. एकाच वेळी दोन तरुण मुलांचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
या प्रकरणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून, पालकांनी आपल्या मुलांना अशा धोकादायक आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






