संगमनेर –
सध्या काही कीर्तनकार राजकीय पक्षांचे जाहीर प्रचारक म्हणून काम करत असले, तरी पूर्वीही राजकीय पक्षांचा छुपा प्रचार अनेकदा झालेला आहे, असं मत ‘रिंगण’ मासिकाचे संपादक सचिन परब यांनी व्यक्त केलं.
सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परब बोलत होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते. तर ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, भारत महाराज घोगरे गुरुजी, समाधान महाराज देशमुख आणि पत्रकार-कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर उपस्थित होते.
परब यांनी आपल्या बालपणीचा एक अनुभव सांगत वारकरी संप्रदायातील या चुकीच्या गोष्टीवर प्रकाश टाकला. सचिन परब मूळचे कोकणातील असून, लहानपणी ते त्यांच्या आजीसोबत अनेकदा पंढरपूरच्या वारीला गेले होते. असाच एकदा वारी दरम्यान ते देगलूरकर मठातील चातुर्मास प्रवचन ऐकण्यासाठी बसले होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांची राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा सुरू होती.
त्या दिवशी ही रथयात्रा बिहारमध्ये पोहोचणार होती आणि बिहारचे तत्कालीन नेते लालू प्रसाद यादव यांनी ती रथयात्रा अडवली. ही बातमी मठात पोहोचल्यावर, देगलूरकर फडावर चालणाऱ्या प्रवचनात मोठा बदल झाला. समोर संत तुकाराम महाराजांची गाथा असूनही त्यावर एकही शब्द न बोलता तब्बल अडीच तास पूर्णपणे राजकीय भाष्य करण्यात आलं, अशी आठवण परब यांनी सांगितली.
त्या-त्या वेळच्या धर्मपीठांनी संतांना नेहमीच त्रास दिला आहे, असं ते म्हणाले. ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकलं गेलं, तर तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याचा प्रयत्न केला गेला. हे सर्व धर्मपीठांनीच केलं. त्यामुळे संत आणि धर्मपीठ यांच्यात नेहमीच संघर्ष राहिला आहे, असं परब यांनी स्पष्ट केलं.
महात्मा गांधी यांनी संत तुकाराम महाराजांच्या सोळा अभंगांचं भाषांतर केलं आहे. गांधीजींचा संत विचारांवर दृढ विश्वास होता आणि ते वारकऱ्यांना प्रिय असले पाहिजेत. मात्र, आज गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला जर कीर्तनकार प्रिय मानत असतील, तर ही केवळ कीर्तनकार किंवा वारकरी समाजासाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी खंतही सचिन परब यांनी व्यक्त केली.
राजाभाऊ आवसक, अविनाश पाटील, शरद कदम, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, रजत आवसक, राजेंद्र शित्रे, आणि जयवंत भोंडवे आदींनी या परिषदेचे आयोजन केले होते.
कीर्तनकारांकडून अनेकदा राजकीय पक्षाचा प्रचार, ‘धर्मपीठांनी संतांना नेहमीच त्रास दिला’ – पत्रकार सचिन परब
संगमनेर येथील राज्यस्तरीय वारकरी चिंतन परिषदेत परब बोलत होते





परब यांनी आपल्या बालपणीचा एक अनुभव सांगत वारकरी संप्रदायातील या चुकीच्या गोष्टीवर प्रकाश टाकला.
राजाभाऊ आवसक, अविनाश पाटील, शरद कदम, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, रजत आवसक, राजेंद्र शित्रे, आणि जयवंत भोंडवे