नवी दिल्ली-
सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते अवघे ४८ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने कायदेक्षेत्र आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
माजी केंद्रीय कृषीमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू असलेले सिद्धार्थ शिंदे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी होते, मात्र त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहे. सोमवारी कामकाजासाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. त्यानंतर तातडीने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सिद्धार्थ शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात वकिली करत होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे उत्तम आकलन, तसेच संविधानाचे सखोल ज्ञान असलेले विधिज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. कायद्यातील गुंतागुंतीचे विषय सामान्य लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता.
सिद्धार्थ शिंदे यांचे पार्थिव मंगळवारी (१६ सप्टेंबर २०२५) सकाळी नवी दिल्लीहून पुण्यातील त्यांच्या घरी आणले जाणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी, रविवार पेठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांच्या अकाली निधनाने शिंदे, जगदाळे आणि जगताप या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजकारणी, सहकारी आणि कुटुंबियांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिध्दार्थ शिंदे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा थोर कृषीतज्ञ अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे हे नातू होते. संविधानाविषयीचे सखोल ज्ञान, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरील बारकाईची दृष्टि यामुळे त्यांनी न्यायालयीन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. गेल्या अनेक दशकांपासून ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करत न्यायप्रक्रियेला दिशा देत होते. कायद्याची गुंतागुंत सामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट करण्याची त्यांची खासियत होती. त्यांच्या निधनाने न्यायव्यवस्था आणि महाराष्ट्राने या एक जाणकार, अभ्यासू व समर्पित व्यक्तिमत्त्व कायमचे गमावले आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मामाच्या मुलाच्या निधनाबद्दल बोलताना, माझा मामेभाऊ व सुप्रीम कोर्टातील यशस्वी, अभ्यासू विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाच्या बातमीने मी सुन्न झालो आहे. सिद्धार्थ दादा माझ्यासाठी फक्त भाऊ नव्हता, तर तो एक जिवलग मित्रही होता. पहिली दिल्ली वारी मला त्यानेच २५ वर्षांपूर्वी करून दिली होती. आयुष्यातील पहिला परदेश प्रवास, सिंगापूरला, तो तेथे शिक्षण घेत असताना त्यानेच मला सोबत नेले होते. तो अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रेमळ माणूस होता. त्यांचे आजोबा, डॉ. आण्णासाहेब शिंदे हे देशाचे १६ वर्षे कृषी व अन्नमंत्री होते. देशातील हरितक्रांती तसेच धवलक्रांती (दुग्धव्यवसाय) घडवून आणण्याचे श्रेय त्यांना जाते. सिद्धार्थ दादाच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबावर, शिंदे परिवारावर, त्याचे मामा दौंडच्या जगदाळे परीवारावर, त्याची बहीण दिलेल्या आर्वी (वर्धा) येथील खा. अमर काळे परीवारावर तसेच त्यांची सासुरवाडी सासवडच्या जगताप परिवारावर, जगभर पसरलेल्या सिध्दार्थदादाच्या मित्र परीवारावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने न्यायव्यवस्था आणि महाराष्ट्राने एक जाणकार, अभ्यासू आणि समर्पित व्यक्तिमत्त्व गमावले आहे. सिद्धार्थ दादा माझ्यासाठी फक्त भाऊ नव्हता, तर एक जिवलग मित्रही होता. तो अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रेमळ माणूस होता.



नवी दिल्ली-



