संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका करत, आयोग पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक कार्यक्रम मंत्रालयातील कोणीतरी पीए ठरवत असून आयोग त्याची अंमलबजावणी करत असल्याचा खळबळजनक आरोप थोरात यांनी केला. तसेच, मतदान आणि मतमोजणीतील २० दिवसांच्या अंतरावर आक्षेप घेत, EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) पेट्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, राज्यघटना आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि अचानक मतदान स्थगित केले जाते, असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नाही. सावळा गोंधळ चालू असल्याचे दिसते, असे ते म्हणाले.
थोरात यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की, निवडणूक आयोगाने मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. मात्र असे होत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगातील अधिकारी उच्च पदस्थ आणि अनुभवी असूनही ते सत्तेच्या दबावाखाली काम करत आहेत. निवडणूक आयोग स्वतंत्रपणे निर्णय घेत नाही, तर मंत्रालयातील पीए कार्यक्रम आखतो आणि आयोग तो जाहीर करतो, अशी थेट टीका त्यांनी केली.
थोरात यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावरही तीव्र आक्षेप घेतला. या त्रुटींबाबत वारंवार दाद मागूनही राजकीय हस्तक्षेपामुळे त्यात सुधारणा होत नसल्याचे ते म्हणाले. “मतदार यादीतील गोंधळ आणि ईव्हीएमबाबत ते (सत्ताधारी) काहीही करू शकतात, हे सर्व देशाने पाहिले आहे,” असे सांगत त्यांनी EVM आणि संपूर्ण प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली.
राज्यघटना आणि देश टिकवण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. मतदान प्रक्रिया निर्वेधपणे पार पडली तरच लोकांचा लोकशाहीवर विश्वास राहील. आज मतदान झाल्यानंतर उद्याच मतमोजणी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण २० दिवसात ईव्हीएम पेट्यांचे काय होईल, याबाबत सर्व देशातील जनतेला शंका आहे. सत्ताधाऱ्यांचे वागणे असे आहे की शंका येणे साहजिक आहे, असे मत थोरात यांनी व्यक्त केले.
दरम्यान, तब्बल ९ वर्षांनंतर संगमनेर पालिकेची निवडणूक होत असल्यामुळे नागरिकांमध्ये मतदानाबद्दल मोठा उत्साह दिसून आला. सकाळीच नागरिकांनी प्रत्येक मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या.
यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम विकासाची कामे केल्याचे नमूद केले. संगमनेर तालुका आणि शहर हे एक परिवार असून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोग सत्तेचा गुलाम झाला! – बाळासाहेब थोरात यांची टीका; EVM वर गंभीर आक्षेप
आमदार सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम विकासाची कामे केल्याचे नमूद केले.




संगमनेर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर टीका करत,
थोरात यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावरही तीव्र आक्षेप घेतला.

