अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज
काही महिन्यांपूर्वीच वडिलांचे छत्र हरपले… पदराखाली दोन काळजाचे तुकडे घेऊन माऊली माहेरी आधार शोधायला आली होती पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. वीरगाव (ता. अकोले) येथे सोमवारी सायंकाळी विहिरीत पडल्याने दोन चिमुकल्या बहीण-भावंडांचा अंत झाला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, एका दुर्दैवी मातेचा आधारच हिरावला गेल्याने परिसरात सन्नाटा पसरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीरगाव येथील एका शेतातील विहिरीत दोन बालके पडल्याची धक्कादायक माहिती सोमवारी (दि. १५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास समोर आली. या घटनेत पीयूष पोपट मेंगाळ (वय ८ महिने) आणि श्रेया पोपट मेंगाळ (वय अडीच वर्षे) या दोन निष्पाप जीवांचा करुण अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. सोमवारी रात्री उशिरा पीयूषचा मृतदेह शोधण्यात यश आले, तर चिमुकल्या श्रेयाचा मृतदेह मंगळवारी सकाळी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.
या घटनेतील हृदयद्रावक बाब म्हणजे, या दोन्ही बालकांचे वडील पोपट मेंगाळ (रा. निळवंडे) यांचा अवघ्या ७-८ महिन्यांपूर्वी एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर खचलेली माता आशा मधे ही आपल्या दोन्ही मुलांसह वीरगाव येथे माहेरी वास्तव्यास आली होती. मुलांच्या तोंडाकडे पाहून ती दुःख पचवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र या घटनेने तिच्या आयुष्यातील उरलासुरला आधारही हिरावून नेला आहे.
या घटनेनंतर वीरगाव परिसरात सर्वत्र शोककळा पसरली असून दोन्ही चिमुकल्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी सुरू आहे.
हे दोन्ही चिमुकले विहिरीत नेमके पडले कसे? हा घातपाताचा प्रकार आहे का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. दरम्यान नातेवाईकांनी देखील घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा असा अंत झाल्याने वीरगाव सुन्न झाले आहे. सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले पुढील तपास करत आहेत.







