संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोहारे-मिरपूर येथील श्रीक्षेत्र आवजीनाथ बाबा देवस्थान परिसरात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नांदूर शिंगोटे–कोल्हार राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्राद्वारे आणि दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठपुरावा सुरू केला आहे.
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील आवजीनाथ बाबा मंदिराच्या विकासासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. गेल्या वर्षी ५० लाख रुपयांच्या निधीतून भक्त निवासाची उभारणी व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, वर्षातून दोन वेळा भरणारी यात्रा आणि दैनंदिन वर्दळ यामुळे हा परिसर गजबजलेला असतो.
अपघाताचा धोका टाळण्यासाठी पाऊल- सध्या नांदूर शिंगोटे ते कोल्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. हा महामार्ग मंदिराच्या अत्यंत जवळून जात असल्याने भविष्यात मंदिर परिसराची जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. तसेच, वेगवान वाहतुकीमुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिक आणि भाविकांनी उड्डाणपुलाची मागणी केली होती.
ना. नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद- आमदार सत्यजित तांबे यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव घेतली. चौपदरीकरणाच्या मूळ आराखड्यात सुधारणा करून लोहारे-मिरपूर येथे उड्डाणपुलाचा समावेश करावा, अशी विनंती त्यांनी केली. या मागणीवर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यामुळे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या यशस्वी पाठपुराव्याबद्दल लोहारे, मिरपूर, तळेगाव परिसरातील ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे आभार मानले आहेत.
भाविकांची सुरक्षा आणि तीर्थक्षेत्राचा विकास ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गामुळे भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाचा पाठपुरावा केंद्र स्तरावर करत आहोत. — सत्यजित तांबे, आमदार.








