

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर नगर परिषदेच्या इतिहासात एक नवे सुवर्णपान ओढले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला ‘प्रशासक काळ’ आता संपुष्टात येणार असून, नववर्षाच्या पहिल्याच शनिवारी (३ जानेवारी) नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आपल्या पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. या सोहळ्यासाठी संगमनेर पालिकेमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
२१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील ‘संगमनेर सेवा समिती’ने विरोधकांची पालिकेतील सत्तेची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त करत ऐतिहासिक विजय नोंदवला. डॉ. मैथिलीताई तांबे यांनी केवळ विजयच मिळवला नाही, तर संपूर्ण राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या नगराध्यक्षा होण्याचा मानही पटकावला. केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही, तर महायुतीतील शिवसेनेला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालाने तांबे-थोरात गटाचे संगमनेरवरील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
गेल्या चार वर्षांपासून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने धोरणात्मक निर्णयाअभावी अनेक विकासकामे प्रलंबित होती. आता लोकनियुक्त कारभारी सत्तेवर येत असल्याने शहराच्या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. शनिवारी होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनाची स्वच्छता, रंगरंगोटी आणि दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संगमनेर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी डॉ. मैथिलीताई तांबे यांची टीम आता पूर्णपणे सज्ज झाली आहे.
परंपरेचा विजय आणि सत्यजित तांबे यांचा ‘मास्टरस्ट्रोक’ – १९९०-९१ पासून डॉ. सुधीर तांबे यांनी विजयाची जी परंपरा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू केली होती, ती परंपरा आमदार सत्यजित तांबे यांनी ‘सेवा समिती’च्या माध्यमातून अधिक प्रबळ केली आहे. ३१ पैकी २८ जागा जिंकून सेवा समितीने निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. आमदार तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह पडद्याआडून अनेकांनी निवडणुकीपूर्वी आखलेली रणनीती आणि मतदारांशी साधलेला संवाद हाच या विजयाचा मुख्य आधार ठरला आहे.
जिल्ह्याचे लक्ष सोहळ्याकडे- नववर्षाच्या सुरुवातीलाच होणारा हा पदग्रहण सोहळा केवळ संगमनेरसाठीच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता असून, या निमित्ताने संगमनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळू शकते. लोकशाहीचा हा नवा अध्याय संगमनेरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
चार वर्षानंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींसाठी पालिकेची दार उघडणार! – डिसेंबर २०२१ मध्ये पालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी पुन्हा एकदा पालिकेमध्ये नगराध्यक्ष-नगरसेवकांचे राज येणार आहे. यावेळी सभागृहात जुन्या चेहरा सोबत अनेक चेहरे नवीन दिसणार आहेत. नगराध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या काही वर्षात दुर्गाताई तांबे यांनी पालिकेच्या कारभाराला मोठी चालना दिली होती. स्वच्छ सुंदर संगमनेरच्या बाबतीत त्यांनी घेतलेल्या निर्णयाची कालांतराने राज्य पातळीवर देखील अंमलबजावणी करण्यात आली. स्वच्छ शहरांमध्ये तांबे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने कोट्यावधी रुपयांची बक्षिसे देखील मिळविली आहे. आता दुर्गाताई तांबे यांच्या सुनबाई डॉ. मैथिलीताई तांबे नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याने विकास कामांच्या बाबतीत ‘सासू वरचढ सून’ याची प्रचिती आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या माध्यमातून संगमनेरकरांना अनुभवण्यास मिळणार असल्याचे बोलले जाते.






परंपरेचा विजय आणि सत्यजित तांबे यांचा ‘मास्टरस्ट्रोक’