

संगमनेर, प्रतिनिधी –
लोकशाहीत नागरिकांना जसे मूलभूत अधिकार आहेत, तसेच काही कर्तव्येही आहेत. संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ लोकप्रतिनिधी नव्हे, तर जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. पारदर्शकता वाढवण्यासाठी आता प्रत्येक नगरसेवकाचे काम आणि त्याचे मूल्यमापन थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली.
संगमनेरच्या नूतन नगराध्यक्ष डॉ मैथिली तांबे आणि नूतन नगरसेवकांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला, यावेळी तांबे बोलत होते. राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, उद्योजक राजेश मालपाणी मनीषा मालपाणी गिरीश मालपाणी आदी यावेळी उपस्थित होते.
नगरपालिकेच्या कामकाजात डिजिटलायझेशन आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यावर भर देताना आ. तांबे म्हणाले की, इथून पुढे नगरपालिकेचे ऑडिट आणि बॅलन्स शीट अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल. जेणेकरून जनतेला शहराच्या आर्थिक स्थितीची खरी माहिती मिळेल.
यापुढील काळात नागरिकांना जन्म-मृत्यूचे दाखले घरपोच दिले जाणार आहे. तसेच नगरपालिकेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणली जाणार असून यापुढील काळात नगरपरिषदेचा प्रत्येक महत्त्वाचा कागद हा पालिकेच्या वेबसाईटवर असेल. याशिवाय उपनगरांमध्ये दोन ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाची सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे नागरिकांना पालिकेत येण्याचा ताण वाचेल. शास्त्री माफीसाठी सुरू करण्यात आलेल्या अभय योजनेचा देखील लाभ घेण्याचे आवाहन तांबे यांनी यावेळी केले.
निवडणूक काळात काही लोकप्रतिनिधींनी अपुऱ्या माहितीच्या आधारे विधाने केल्याचा समाचार घेत आ. तांबे यांनी पालिकेच्या तिजोरीचे गणित मांडले. नगरपालिकेचे उत्पन्न केवळ १५ कोटी रुपये असताना खर्च १६५ कोटी रुपयांच्या घरात आहे. उर्वरित १५० कोटी रुपये हे शासनाच्या विविध योजनांतून खेचून आणावे लागतात, हे वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या. शहरातील बेशिस्त पार्किंग आणि अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत. प्रसंगी काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी चालतील, मात्र शहराचे आरोग्य बिघडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रभाग समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या सहकार्याने विकासकामे मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘संगमनेर पॅटर्न’ राज्यासाठी दिशादर्शक – संगमनेरमधील सेवा समितीचे स्वच्छता अभियान सोशल मीडियावर गाजले असून, राज्यासाठी ते एक आदर्श मॉडेल ठरले आहे. येथील चांगल्या उपक्रमांचे अनुकरण आज महाराष्ट्र करत आहे. राज्यातील सर्वात आदर्श नगरपालिका म्हणून संगमनेरचा नावलौकिक कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला.






