संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्याने नेहमीच प्रेमाची आणि विश्वासाची साथ दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जो उत्साह दिसला, तो केवळ विजय नसून विकासाचा ‘हाय व्होल्टेज करंट’ आहे. हाच करंट आता चुकीचं बोलणाऱ्यांना आणि सत्तेच्या जोरावर खोट्या केसेस करणाऱ्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, अशा कडक शब्दांत माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला.
पिंपरणे (संगमनेर) येथे आयोजित भव्य शेतकरी मेळावा आणि संगमनेर नगर परिषदेच्या नूतन लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरपीआयचे नेते सुधाकरराव रोहम होते. या मेळाव्याला व्यासपीठावर संगमनेरच्या नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शरद नाना थोरात, शंकरराव खेमनर, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, अजय फटांगरे, साखर संघाचे राज्य उपाध्यक्ष बाबा ओहोळ यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात थोरातांनी तालुक्यातील राजकीय दडपशाही, वाळू तस्करी आणि प्रलंबित विकासकामांवरून सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले.
४० वर्षांच्या हिशोबावरून विरोधकांना फटकारले- विरोधकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या “४० वर्षांत काय केले?” या प्रश्नाला थोरातांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, सामान्य माणसाच्या जीवनात आलेली समृद्धी आणि झालेलं परिवर्तन हेच माझ्या कामाचं उत्तर आहे. ज्यांना साधा नगर-मनमाड रस्ता दुरुस्त करता येत नाही, त्यांनी आम्हाला ४० वर्षांचा हिशोब विचारू नये. तालुक्यातील शैक्षणिक संस्था, सोसायट्या आणि उभ्या राहिलेल्या वास्तू हे आमच्या कष्टाचं फळ आहे.
वाळू तस्करी आणि ड्रग्ज प्रकरणावरून चिंता- तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करताना थोरात यांनी गंभीर आरोप केले. काही मंडळी केवळ वाळूचा धंदा करण्यासाठी पक्ष सोडून गेल्याची टीका त्यांनी केली. नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ढकलली जात आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे ड्रग्ज आणि अमली गोळ्या सापडल्याच्या घटना धक्कादायक आहेत. बिगर कष्टाचा पैसा आणि व्यसनं तुमच्या घराचं वाटोळं करतील, असा इशारा त्यांनी पालकांना दिला.
निळवंडे आणि रेल्वे: विकासाची नवी स्वप्ने- निळवंडे धरणाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. “मी पाणी शिजवून वाढून ठेवलं, पण जेवायच्या वेळी मी आमदार नव्हतो याचं दुःख नाही; मात्र ते पाणी वंचित शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प हा तालुक्याच्या प्रगतीसाठी निळवंडे इतकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवाद आणि खोट्या केसेसचा निषेध- सध्या तालुक्यात कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खोट्या केसेस टाकण्याचे सत्र सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. झाडाच्या फांद्या तोडल्या तरी गुन्हे दाखल केले जात आहेत. आम्ही मंत्री असताना कधीही कोणावर सूडबुद्धीने कारवाई केली नाही, पण सध्या चाललेला हा प्रकार लोकशाहीला घातक आहे, असे ते म्हणाले.
निवडणुकीचे रणशिंग: शरद नाना थोरात यांची उमेदवारी जाहीर- याच मेळाव्याच्या व्यासपीठावरून बाळासाहेब थोरात यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकले. त्यांनी शरद नाना थोरात यांची जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. संगमनेरचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि तालुक्याला ‘गुलामगिरी’तून वाचवण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन त्यांनी केले.








