आश्वी, प्रतिनिधी-
आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत आश्वी खुर्द येथील दोन महिलांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. महांकाळेश्वर मंदिर परिसरात सापडलेली ३० हजार रुपये किमतीची सोन्याची वस्तू मूळ मालकिणीला परत करून त्यांनी माणुसकी जपली आहे.
२७ डिसेंबर रोजी महांकाळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या उज्वला भंडारे यांना सोन्याची एक मौल्यवान वस्तू सापडली. त्यांनी ही माहिती पती मनोज भंडारे यांना दिली. त्यानंतर पत्रकार संजय गायकवाड यांच्या मदतीने सोशल मीडियावर याबद्दल संदेश प्रसारित करण्यात आला. दरम्यान, १२ वीत शिकणाऱ्या श्रावणी जगताप या विद्यार्थिनीलाही त्याच वस्तूचा उर्वरित भाग सापडला होता. तिनेही या संदेशाला प्रतिसाद देत संपर्क साधला.
योग्य चौकशीअंती सदर सोने कांताबाई दत्तात्रय मांढरे यांचे असल्याचे स्पष्ट झाले. आपली मौल्यवान वस्तू सुखरूप मिळाल्याने मांढरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.
कृतज्ञता म्हणून मांढरे परिवाराने दोघींना प्रत्येकी २१०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, श्रावणी आणि उज्वला यांनी ते बक्षीस नाकारून, ती सर्व रक्कम स्थानिक श्रीराम-दत्त-पुंजाआई माता मंदिर जिर्णोद्धारासाठी देणगी म्हणून दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे आणि दातृत्वाचे सरपंच अलकाताई गायकवाड यांच्यासह संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.
प्रामाणिकपणाचा दागिना सोन्याहून पिवळा! आश्वी खुर्दच्या दोन महिलांनी जपली माणुसकी, बक्षिसाची रक्कमही मंदिर जिर्णोद्धारासाठी अर्पण; श्रावणी जगताप व उज्वला भंडारे यांचे कौतुक
कृतज्ञता म्हणून मांढरे परिवाराने दोघींना प्रत्येकी २१०० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, श्रावणी आणि उज्वला यांनी ते बक्षीस नाकारून, ती सर्व रक्कम स्थानिक श्रीराम-दत्त-पुंजाआई माता मंदिर जिर्णोद्धारासाठी देणगी म्हणून दिली.








