संगमनेर, प्रतिनिधी-
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित आणि वैभवशाली’ शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरला गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. शहरातील वाढती अमली पदार्थांची तस्करी, दहशत आणि चोऱ्यांच्या घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, ही गुन्हेगारी तातडीने थांबवावी, या मागणीसाठी शहरातील महिला पदाधिकारी कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात आज नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाला तीव्र भावनांचे निवेदन देण्यात आले.
शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात महिलांनी शहरातील विदारक परिस्थिती मांडली आहे. पोलीस निरीक्षक बारवकर यांनी महिलांच्या भावना जाणून घेत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
संगमनेरमध्ये सध्या अवैध अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली असून, यामुळे शालेय व महाविद्यालयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. तसेच, शहरात चोरी, मारहाण आणि भरदिवसा दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिला आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील पोलीस गस्त (पेट्रोलिंग) तातडीने वाढवावी. संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर कडक पाळत ठेवावी. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. चोरी आणि दहशतीच्या घटनांना पायबंद घालून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा आदी प्रमुख मागण्या या रणरागिणींनी केल्या आहे.
हे संगमनेरचे दुर्दैव – यावेळी बोलताना माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची राज्यात एक वेगळी प्रतिष्ठा आहे. मात्र, अलीकडच्या काळात शहरात ज्या प्रकारे गुन्हेगारी आणि ड्रग्जचा शिरकाव झाला आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आता अधिक कठोर होण्याची गरज आहे. दोषींना पाठीशी न घालता त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी.
यावेळी नगरसेविका दिपाली पंचारिया, सरोजिनी पगडाल, वनिता गाडे, नंदा गरुडकर, अनुराधा सातपुते, सीमा खटाटे, विजया गुंजाळ यांच्यासह मंगल कासार, सुषमा भालेराव, मीना सोसे, उज्वला पगार, मुमताज सौदागर, शोभा तुपे, मोहिनी बनसोडे, वैशाली कोल्हे, सोनिया थोरात, शिवानी गाडे, सुविधा आरसिद्ध, सुनीता कांदळकर, वर्षा भोंडे, मनीषा शिंदे, ज्योती दारोळे, कीर्ती मुळे, दीपा कलंत्री, मीनल निऱ्हाळी, कल्पना कुटे, स्नेहलता एखंडे, कोमल दायमा आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
थांबवा ती गुन्हेगारी! संगमनेरच्या शांततेला तडे; अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीविरोधात दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे पोलीस प्रशासनाला साकडे
संगमनेरमध्ये सध्या अवैध अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली असून, यामुळे शालेय व महाविद्यालयीन तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. तसेच, शहरात चोरी, मारहाण आणि भरदिवसा दहशत निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिला आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे



संगमनेर, प्रतिनिधी-



