महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर:
एकीकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) धडक आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांचे कंबरडे मोडण्यासाठी आक्रमक मोहीम हाती घेतली असताना, संगमनेर तालुक्यात मात्र याचे साधे पडसादही उमटलेले नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात कारवाईचा दणका सुरू असताना, संगमनेरच्या अन्न व औषध प्रशासनाला नेमकी कोणती ग्लानी आली आहे, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे.

संगमनेरमधील या संशयास्पद शांततेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, येथील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमर कतारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संगमनेरमधील विदारक स्थितीवर थेट बोट ठेवले आहे. संगमनेरमधील अनेक बड्या हॉटेल्स आणि ढाब्यांवर सर्रासपणे भेसळयुक्त पनीरचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी रोज समोर येत आहेत.
तरुणाईची पहिली पसंती असलेल्या चायनीज खाद्यपदार्थांमध्ये तर मानवी आरोग्याला अत्यंत घातक ठरणाऱ्या रसायनांचा आणि पदार्थांचा बेसुमार वापर केला जात आहे. इतकेच नव्हे तर सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील अन्नधान्य, कडधान्य, खाद्यतेल आणि दुग्धजन्य पदार्थांमध्येही राजरोसपणे भेसळ करून ग्राहकांची उघड माथी फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप कतारी यांनी केला आहे.

या चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे, शहरातील आईस्क्रीम पार्लर्स, बेकरी आणि मिठाई व्यवसायात अत्यंत निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात आहे. सणासुदीच्या काळात आणि एरवीही दूध, पनीर आणि खवा यामध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक भेसळ होत असल्याचे उघड गुपित आहे. परराज्यातील काही संशयास्पद व्यावसायिक संगमनेरमध्ये ठाण मांडून बसले असून, कोणतीही परवानगी किंवा गुणवत्तेचे निकष न पाळता लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. असे असतानाही स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या उत्पादनांची साधी तपासणी करण्याची तसदीही घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अहिल्यानगर जिल्हास्तरीय अधिकारी नक्की कोणाच्या दबावाखाली गप्प बसले आहेत, असा सवाल आता जनता विचारत आहे. या सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी अमर कतारी यांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेच साकडे घातले आहे.
नागरिकांच्या जिवाशी आणि आरोग्याशी खेळणाऱ्या या भेसळखोरांना कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये. अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ संगमनेरमधील सर्व हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या आस्थापनांवर धाडी टाकून तपासणी करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी शिवसेनेने केली आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः या गंभीर प्रकरणात लक्ष घालून संगमनेरच्या सुस्त अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी कतारी यांनी केली आहे. अन्यथा, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आणि जनतेच्या आरोग्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संगमनेरमध्ये तीव्र आणि ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अमर कतारी यांनी दिला आहे.
आता या इशाऱ्यानंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले एफडीए प्रशासन जागे होणार की भेसळखोरांना पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

