
संगमनेर (प्रतिनिधी):
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेची आणि सुरक्षेची पुरती वाट लागली आहे. भरदिवसा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले जात असून, बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून रोकड आणि दागिने लंपास केले जात आहेत. या मालिका गुन्ह्यांमुळे संगमनेरमध्ये ‘कायद्याचे राज्य’ उरले आहे की ‘गुन्हेगारांचे वर्चस्व’ वाढले आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
पहिली घटना शहरातील गजबजलेल्या बी.एड. कॉलेज रोडवरील ईदगाह मैदानाच्या गेटजवळ घडली. अनिता संतोष पितळे (रा. सह्याद्री कॉलेजच्या मागे) या आपल्या किराणा दुकानाकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसका मारून चोरून नेले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे तपास करत आहेत.
दुसरी घटना नवीन नगर रस्त्यावर घडली आहे. येथील एका अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. फिर्यादी आपल्या पत्नीसह कामानिमित्त बाहेर गेले असताना, दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडीचे धाडस केले. या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पोलीस यंत्रणा काय करतेय? ‘आर्थिक’ हितसंबंधांची चर्चा!- शहरात चोरीचे सत्र केवळ रात्रीच नव्हे, तर आता दिवसाढवळ्या सुरू आहे. एकीकडे सर्वसामान्यांच्या कष्टाची कमाई चोरटे लुटत असताना, दुसरीकडे पोलीस यंत्रणा मात्र ‘सुस्त’ असल्याचे चित्र आहे. स्थानिक शहर पोलीस, पोलीस उपाधीक्षक कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय आणि एलसीबी (LCB) यांसारख्या मोठ्या यंत्रणा असतानाही गुन्हेगारीवर नियंत्रण का नाही? असा सवाल विचारला जात आहे.
शहरात फोफावलेले अवैध धंदे हेच गुन्हेगारीचे मुख्य केंद्र ठरत असून, या धंद्यांना पोलीस यंत्रणेचे छुपे ‘अभय’ तर मिळत नाही ना, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. पोलीस यंत्रणा तपासापेक्षा ‘आर्थिक’ तडजोडींमध्येच अधिक मग्न असल्याच्या चर्चांनी आता शहरात जोर धरला आहे.




