
संगमनेर:
संगमनेर शहरात अवैध धंद्यांनी अक्षरशः कळस गाठला असून, स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील जमजम कॉलनी भागात स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या एका मोठ्या गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पहाटेच्या सुमारास छापा टाकला.
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत ५ लाख ५३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या कारवाईमुळे शहर पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि कत्तलखाने बंद करण्यात प्रशासनाला आलेले अपयश आता चव्हाट्यावर आले आहे.
६ फेब्रुवारीच्या पहाटे जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक ९ मध्ये रक्ताचा सडा पडलेला असताना आणि जनावरांची कत्तल सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींची पळापळ झाली, तरीही पोलिसांनी साहेब मोहीद्दीन कुरेशी (वय २३) याला झडप घालून जेरबंद केले.
या छाप्यात पोलिसांनी ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५०० किलो गोमांस, १ लाख रुपये किमतीचे दोन जिवंत गोवंश, इलेक्ट्रिक वजनकाटा आणि धारदार हत्यारे जप्त केली आहेत. या प्रकरणी फरार झालेले आरोपी साहिल उर्फ साद कुरेशी आणि अयान कुरेशी यांचा शोध सुरू आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी शहरातील इतर कोपऱ्यांत सुरू असलेले असे अवैध धंदे कायमस्वरूपी कधी बंद होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, भरवस्तीत इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तल सुरू असताना स्थानिक शहर पोलिसांना याची कुणकुण कशी लागली नाही? स्थानिक यंत्रणेच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य आहे का? असे संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. अवैध कत्तलखाने बंद करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.
एलसीबीच्या या धाडसी कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असले, तरी स्थानिक प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
📌 हप्तेखोरी की हलगर्जीपणा?
संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत, नागरी वस्तीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडतो, पण शहर पोलिसांना त्याचा सुगावा लागत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. एलसीबीला जे दिसते, ते स्थानिक गुन्हे शोध पथकाला (DB) का दिसत नाही? हा केवळ यंत्रणेचा ढिसाळपणा आहे की यामागे काही ‘अर्थपूर्ण’ लागेबांधे आहेत? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, स्थानिक पोलिसांच्या या ‘आंधळेपणाची’ देखील चौकशी करण्याची वेळ आली आहे.





