मान्सून खोळंबला; किमान १५ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक पावसाची शक्यता धूसर, शेतकऱ्यांना घाई न करण्याचे आवाहन
हा पाऊस सर्वव्यापी नसल्यामुळे तो पेरणीसाठी पूरक ठरणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे. सध्याच्या स्थितीनुसार १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होऊ शकतो. परंतु, हा पाऊस सर्वव्यापी नसल्यामुळे तो पेरणीसाठी पूरक ठरणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर, आगामी वादळी पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच, दुपारनंतर होणाऱ्या मेघगर्जनेच्या काळात नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होत असताना झाडांखाली, टिनशेडखाली किंवा विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे पूर्णपणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
