महाराष्ट्रातील प्रगतशील आणि सर्वांगीण विकसित तालुक्यांचा विचार केला, तर आज बारामतीपाठोपाठ संगमनेर तालुक्याचे नाव अत्यंत अग्रक्रमाने घेतले जाते. संगमनेरची ही शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगती एका दिवसात झालेली नसून, त्यामागे १९८५ पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेले अथक परिश्रम आणि अविश्रांत कष्ट आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दूरदृष्टीने संगमनेरचा कायापालट केला आहे, म्हणूनच त्यांना या तालुक्याच्या विकासाचे खरे शिल्पकार मानले जाते.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांचा आणि संघर्षाचा वारसा घेऊन बाळासाहेबांनी राजकारणात प्रवेश केला. एका दुष्काळी तालुक्याला सधन बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्याची सुरुवात १९८९ मध्ये भंडारदर्याच्या हक्काच्या पाण्यासाठी दिलेल्या तीव्र लढाने झाली. या संघर्षामुळे संगमनेरला ३० टक्के हक्काचे पाणी मिळाले. ‘पाणी हेच जीवन’ हे सूत्र ओळखून त्यांनी संपूर्ण तालुक्यात पाईपलाईनचे जाळे निर्माण केले, ज्यामुळे इथली शेती खऱ्या अर्थाने फुलली. १९९१ ते ९५ या काळात त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायावर भर दिला. गावोगावी दूध संस्था स्थापन करून संकरित गाईंच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगाराची नवी दिशा दिली. आज याच प्रयत्नांमुळे तालुक्यातून दररोज ९ लाख लिटर दूध उत्पादन आणि १५ लाख अंडी निर्मिती होत असून, मोठी आर्थिक संपन्नता निर्माण झाली आहे.
बाळासाहेबांनी केवळ शेतीच नाही, तर जलसंधारण, बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातही क्रांती घडवून आणली. गावोगावी ओढे आणि नाल्यांवर कोल्हापुरी व दगडी बंधाऱ्यांचे जाळे विणून त्यांनी पाणी अडवले आणि जिरवले. ग्रामीण भागात विद्यालयांची निर्मिती करून शिक्षणाची गंगा दारात पोहोचवली, तर पतसंस्थांच्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक आधार मिळाला. आज संगमनेरच्या बँकिंग क्षेत्रात तब्बल १० हजार कोटींच्या ठेवी असणे, हे या आर्थिक सक्षमीकरणाचेच निदर्शक आहे. विशेषतः तळेगावसह दुष्काळी भागासाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. १९९९ मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री असताना अनेक तांत्रिक व राजकीय अडचणींवर मात करून त्यांनी धरण व कालव्यांची कामे पूर्णत्वास नेली. आज निळवंडेचे पाणी जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचते, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत दिसणारे समाधान हीच बाळासाहेबांच्या कार्याची खरी पावती आहे.
राजकीय कारकिर्दीत महसूल, कृषी, शालेय शिक्षण आणि रोजगार हमी यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळताना त्यांनी प्रशासन लोकाभिमुख करण्यावर भर दिला. स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान बाळगत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कठीण काळात धुरा सांभाळली. राजकारण हे सत्तेसाठी नसून सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी असते, हा विचार त्यांनी कायम जपला. त्यांच्या याच निष्ठेची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या २१ नेत्यांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले. देवकौठे ते बोटा अशा १०० किलोमीटरच्या विस्तीर्ण पट्ट्यात त्यांनी विकासाचे जे ‘संगमनेर मॉडेल’ उभे केले आहे, ते आज संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ‘एक तालुका, एक परिवार’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यांनी कार्यक्षम व्यक्तींना संधी दिली आणि युवकांसाठी सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात मोठी व्यासपीठे निर्माण केली. २०२४ मधील राजकीय निकाल अनपेक्षित असले आणि त्याने अनेकांना चटका लावला असला, तरी बाळासाहेब थोरात डगमगले नाहीत. ते आजही सातत्याने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हे जनतेचा त्यांच्यावर असलेल्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. साहित्य, कला आणि वाचनाची आवड जोपासणाऱ्या या सुसंस्कृत नेतृत्वाने नेहमीच स्व. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेला आहे. आजही तोच रुबाब आणि तोच मान-सन्मान कायम असून, येणाऱ्या काळात त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला नक्कीच नवी दिशा देणारे ठरेल.
संगमनेरला विकासाच्या शिखरावर नेणाऱ्या या महानायकाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
— प्रा. नामदेव कहांडळ, जनसंपर्क अधिकारी.








