
संगमनेर/श्रीरामपूर:
राज्यात नवीन फौजदारी कायदा ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ ची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून, उत्तर नगर जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी ‘मोक्का’ सदृश कारवाईचा धडाका लावला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीत असताना पकडलेल्या टोळीवर आता भारतीय न्याय संहितेचे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे केवळ ८-१० दिवसांत जामिनावर बाहेर येणाऱ्या गुन्हेगारांना आता किमान एक वर्ष जेलमध्येच राहावे लागणार असून, त्यांना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, अशी माहिती श्रामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री संगमनेर शहर पोलिसांनी कोल्हेवाडी रोड परिसरात गस्त घालत असताना, अंधाराचा फायदा घेऊन दरोड्याच्या तयारीत बसलेल्या सहा आरोपींच्या टोळीला शस्त्रांसह रंगेहात पकडले होते. या टोळीकडून मोटारसायकली, घातक शस्त्रे आणि मिरची पूड असे साहित्य जप्त करण्यात आले होते. सुरुवातीला हा गुन्हा सामान्य चोरीच्या कलमान्वये दाखल झाला होता, परंतु तपासादरम्यान या आरोपींचा सराईत गुन्हेगारी इतिहास समोर आला.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी श्रीरामपूर विभागातील गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांचा एक विशेष ‘क्राईम डेटाबेस’ तयार केला आहे. या डेटाबेसमधून धक्कादायक माहिती समोर आली की, या टोळीतील आलम अकबर पठाण आणि सलीम अकबर पठाण यांच्यावर यापूर्वी डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. नवीन कायद्यानुसार, जर आरोपींनी यापूर्वी एकत्रितपणे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे केले असतील, तर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लावता येते. याच तरतुदीचा आधार घेत श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांनी या टोळीवर कलम १११ नुसार कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.
भारतीय न्याय संहितेतील हे कलम १११ विशेषतः संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. या कलमांतर्गत कारवाई झाल्यास आरोपींना जामीन मिळणे अत्यंत कठीण होते आणि त्यांना किमान एक वर्ष कारागृहातच राहावे लागते. या गुन्ह्यातही जर हे कलम लावले नसते, तर आरोपी आठ-दहा दिवसांत जामिनावर बाहेर आले असते. मात्र, आता या टोळीला मोक्का कायद्याप्रमाणेच कठोर शिक्षेची आणि प्रदीर्घ कारावासाची तरतूद लागू झाली आहे.
श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दररोज दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपींची माहिती ‘क्राईम डेटाबेस’शी जुळवून पाहिली जाते. यासाठी एक विशेष पोलीस अंमलदार नियुक्त करण्यात आला असून, सराईत गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हा केल्यास त्यांच्यावर तातडीने कलम १११ प्रस्तावित केले जाते. चालू वर्षात आतापर्यंत उत्तर नगर जिल्ह्यातील चार गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारे कठोर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या पथकाने केली आहे.







