झरेकाठी, वार्ताहर:
खळी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या मुलाच्या विवाहानिमित्त समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवत ‘एक पाहुणा – एक आंबा रोप’ हा अभिनव उपक्रम राबविला आहे. दिखाऊपणा आणि अवाजवी खर्चाला फाटा देत चौधरी कुटुंबाने लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना कलमी आंब्याची रोपे भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा सामाजिक संदेश दिला.
प्रगतशील शेतकरी बाळासाहेब डोळे व पत्रकार सोमनाथ डोळे यांचे भाचे ऋषिकेश आणि राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव दाढकर यांची कन्या साक्षी यांचा विवाह सोहळा नुकताच अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्याची आगळीवेगळी पद्धत. पारंपरिक शाल-श्रीफळाऐवजी प्रत्येकाला कलमी आंब्याचे रोप देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात फळझाडांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळणार असून, पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या सोहळ्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवाह प्रसंगी ह.भ.प. दत्तगिरी महाराज, नेवासा तालुक्यातील बालब्रह्मचारी बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, ह.भ.प. कुहिले महाराज आणि महंत माणिक गिरी महाराज यांचे विशेष आशीर्वाद लाभले. उपस्थितांची संख्या मोठी असल्याने वेळेचे योग्य नियोजन करण्यासाठी आयोजकांनी फक्त महाराज व महंतांच्या उपस्थितीत आशीर्वाद कार्यक्रम पार पाडण्याचा शिस्तबद्ध निर्णय घेतला, याचे पाहुण्यांनी मनापासून स्वागत केले.
विवाह सोहळ्यास पद्मश्री कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास नाना पाटील तांबे, राहुरी तालुक्याच्या माजी सभापती मंदाताई डुकरे, प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक पोपटराव वाणी, ॲड. आप्पासाहेब दिघे, संगमनेर दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता जावेद सय्यद व प्रल्हाद पाठक, सामाजिक कार्यकर्ते सुरेश नागरे, शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्याम गोसावी, रमेश पन्हाळे, नारायण कहार, प्राध्यापक बाबासाहेब वाणी, तंटामुक्ती अध्यक्ष विष्णू सिनारे, प्राध्यापक सतीश वाणी, प्राध्यापक शुभम चौधरी, माधव हारदे, मुख्याध्यापक हनुमंता गिरी, योगेश चोरमुंगे, राजेंद्र चोरमुंगे, किरण अंत्रे, डॉ. किरण आहेर, ॲड. विवेक लगड, निवेदिका गायत्री मस्के, उद्योगपती लक्ष्मणराव डोळे, प्राध्यापक रामचंद्र डोळे, भाऊसाहेब जपे, गोकुळ वाणी, मधुकर वाणी, डॉ. पोपटराव वाणी, विलास वाणी, काशिनाथ चव्हाण, शिवाजी वाकचौरे, रवींद्र कांबळे, प्रकाश सोनवणे, अनिल पाटोळे, डॉ. अनिल लोखंडे, पत्रकार, राजेश गायकवाड, रवींद्र बालोटे, शिक्षक संघटनांचे साहेबराव अनाप, प्रा. विलास वाणी, चांगदेव पलघडमल, पोपटराव आनंदराव पाटील, भिकाजी वाणी, ग्रामविकास अधिकारी अनिल वाणी, गोरख वाणी, अनुराधाताई वाणी, सरपंच अशोक वाणी यांच्यासह शिक्षण, कृषी आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. जनसेवा युवा झरेकाठी मंचच्या सदस्यांनीही या उपक्रमाला साथ दिली. आजच्या काळात दिखाऊपणाला महत्त्व न देता सामाजिक जबाबदारीचे भान राखणारा हा विवाह सोहळा संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरला आहे.






