संगमनेर:
पोलीस म्हंटले की डोळ्यांसमोर येते ती गुन्हेगारांवर वचक ठेवणारी कठोर प्रतिमा आणि खाकी वर्दी. पण याच खाकी वर्दीच्या मागे एक अत्यंत संवेदनशील आणि मायेचा ओलावा जपणारा माणूस दडलेला असतो, याचे हृदयस्पर्शी दर्शन शिर्डीत घडले आहे. सहा वर्षांपूर्वी नियतीने अनाथ केलेल्या चार निराधार भावंडांच्या आयुष्यात प्रकाशदूत बनून आलेले अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पुन्हा एकदा या मुलांची भेट घेऊन माणुसकीच्या नात्याची वीण अधिक घट्ट केली आहे.
या कहाणीची सुरुवात एका अत्यंत वेदनादायी घटनेने झाली होती. सहा वर्षांपूर्वी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील खुपटी येथील तुकाराम हारके आणि संगीता हारके या शेतमजूर दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. दारिद्र्यामुळे आणि हतबलतेमुळे घडलेल्या या घटनेने ईश्वरी, वैष्णवी, गायत्री आणि सूरज ही चार चिमुकली भावंडे एका क्षणात उघड्यावर पडली. रक्ताच्या नात्यातील लोकांनीही जेव्हा या मुलांना सांभाळण्यास नकार दिला, तेव्हा ही मुले भविष्याच्या अंधकारात हरवून जातील अशी भीती निर्माण झाली होती.
मात्र, याच कठीण काळात शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यातील संवेदनशील माणूस जागा झाला. त्यांनी तातडीने पुढाकार घेतला आणि शिर्डी येथील ‘सबका मालिक एक’ प्रतिष्ठानच्या ‘साई आश्रय’ अनाथ आश्रमाचे अध्यक्ष गणेश दळवी यांच्याशी संपर्क साधून या चारही मुलांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला. केवळ आश्रमात दाखल करून ते थांबले नाहीत, तर या मुलांचे शिक्षण आणि संगोपन योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले.
आज सहा वर्षांनंतर हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. एकेकाळी निराधार असलेली ही मुले आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. नुकतीच वाघचौरे यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून या मुलांची आश्रमात जाऊन भेट घेतली. आपल्या ‘पालक’ अधिकाऱ्याला पाहताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भरते आले. विशेष म्हणजे, वाघचौरे यांनी या मुलांशी चक्क इंग्रजीतून संवाद साधत त्यांच्या अभ्यासाचा आढावा घेतला. आज ही मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उत्तम शिक्षण घेत आहेत. वैष्णवी सहावीत, ईश्वरी तिसरीत, गायत्री युकेजीमध्ये तर सूरज पहिलीच्या वर्गात शिकत असून त्यांच्या डोळ्यांत आता भविष्याची नवी स्वप्ने आहेत.
अपर पोलीस अधीक्षक पदासारख्या वरिष्ठ पदावर कार्यरत असतानाही, सहा वर्षांपूर्वी जोडलेले हे माणुसकीचे नाते आजही तितक्याच आपुलकीने जपणारे सोमनाथ वाघचौरे हे समाजघटकांसाठी एक आदर्श ठरले आहेत. त्यांनी केवळ या चार भावंडांचीच नव्हे, तर आश्रमातील इतर सर्व मुलांचीही आस्थेने विचारपूस केली. वर्दीतील या ‘देवदूता’मुळे आज चार मुलांचे भविष्य अंधारातून प्रकाशाकडे झेपावत आहे. माणुसकी अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती या घटनेतून शिर्डीकरांना आली असून सर्व स्तरांतून वाघचौरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कर्तव्याच्या कठोर पाशातही माणुसकीचा पाझर! चार अनाथ भावंडांचे ‘पालक’ बनले अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे
आज सहा वर्षांनंतर हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. एकेकाळी निराधार असलेली ही मुले आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.







