संगमनेर, प्रतिनिधी –
समाजातील अठरापगड जाती-धर्मातील जनतेला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. सामाजिक न्याय, समता, महिलांचा सन्मान, लोकशाही आणि शेतकऱ्यांप्रती असलेला आदर हे महाराजांचे जीवनकार्य आजही जगातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर केले.
![]()
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहात ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ हे महानाट्य सादर करण्यात आले. या महानाटकाने आजचा इतिहास आणि सध्याची सामाजिक स्थिती यावर जळजळीत भाष्य करत उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातले.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, पांडुरंग घुले यांच्यासह संगमनेरमधील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि हजारो नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
या महानाट्यामध्ये स्वराज्याचा मूळ उद्देश आणि आजची परिस्थिती यांची तुलना अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली. स्वराज्यात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते, तिथे धर्मावरून कधीही वाद झाले नाहीत, हा इतिहास आहे. मात्र, सध्या समाजामध्ये वाढलेला भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, व्यसनाधीनता आणि जाती-जातींमध्ये लावले जाणारे भांडण तसेच त्यावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे या नाटकातून दाखवण्यात आले.
प्रा. प्रकाशकुमार वाघमारे आणि संगमनेरचे सुपुत्र डॉ. सागर फापाळे यांच्यासह ४० कलाकारांनी सादर केलेल्या या नाटकातील अनेक प्रसंगांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले. विशेषतः शेतकरी आत्महत्येचा प्रसंग पाहून उपस्थित सुन्न झाले, तर महाराजांनी रक्ताचे पाणी करून उभारलेल्या गडकिल्ल्यांवर आजच्या तरुणाईकडून होणारी हुल्लडबाजी आणि जल्लोष हा चिंतेचा विषय असल्याचे यात दर्शवण्यात आले.
आजच्या या विदारक स्थितीत जर महाराज असते तर त्यांना काय वाटले असते, हा विचार मांडताना महाराजांनी जिरेटोप आणि भवानी तलवारीचा केलेला त्याग हा प्रसंग प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा ठरला. यासोबतच अफजलखान वध, शिवराज्याभिषेक सोहळा, रांझा गावच्या पाटलाला दिलेली शिक्षा, शिवा काशीद यांचे सर्वोच्च बलिदान आणि तानाजी मालुसरे यांची सिंहगडावरील झुंज हे प्रसंग पाहताना शिवप्रेमींनी प्रत्यक्ष शिवकाळाचा थरार अनुभवला. भव्य दिव्य स्टेज, आकर्षक विद्युत रोषणाई आणि प्रेक्षकांमधून होणारी सैन्याची एन्ट्री यांमुळे हे महानाट्य संस्मरणीय ठरले.📌 यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू सर्वांसाठी दिशादर्शक आहेत. संकट काळामध्ये महाराजांचे चरित्र मार्ग दाखवणारे असून त्यांचे विचार प्रत्येकाने जपले पाहिजेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवविचारांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
📌आमदार सत्यजित तांबे यांनीही आपल्या भाषणात युवकांना केवळ जयंतीपुरते मर्यादित न राहता महाराजांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले. आजची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी महाराजांच्या विचारांची नितांत गरज असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. या कार्यक्रमाला संगमनेर शहरातील नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
“रायबा हेच का आपलं स्वराज्य?” महानाटकाने संगमनेरकर सुन्न; आजची स्थिती पाहून महाराजांना काय वाटले असते? छत्रपतींचे विचार हेच जगासाठी खरे दीपस्तंभ – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
विशेषतः शेतकरी आत्महत्येचा प्रसंग पाहून उपस्थित सुन्न झाले, तर महाराजांनी रक्ताचे पाणी करून उभारलेल्या गडकिल्ल्यांवर आजच्या तरुणाईकडून होणारी हुल्लडबाजी आणि जल्लोष हा चिंतेचा विषय असल्याचे यात दर्शवण्यात आले.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्यावतीने
या महानाट्यामध्ये स्वराज्याचा मूळ उद्देश आणि आजची परिस्थिती यांची तुलना


