पिंपरी-चिंचवड:
कौतुक आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टीही साध्य करता येतात, याचाच प्रत्यय साळी समाजातील चिमुकल्या कारवी सारंग साळी हिने आणून दिला आहे. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ‘कळसुबाई’ सर करण्याची ऐतिहासिक कामगिरी कारवीने डिसेंबर २०२५ मध्ये फत्ते केली आहे. तिच्या या अफाट ध्येयधोरणाची दखल थेट ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तिला ‘आयबीआर अचिव्हर’ (IBR Achiever) या मानांकनाने सन्मानित करण्यात आले आहे.
कळसुबाई शिखरावर आजवर अनेक बाल गिर्यारोहकांनी चढाई केली असली, तरी कारवीची ही मोहीम अत्यंत विशेष ठरली. तिने शिखरावर पोहोचण्यासाठी निवडलेला मार्ग हा अत्यंत कमी वापरातील, अनवट आणि खडतर असा ‘ऑफबीट’ मार्ग होता. ज्या मार्गावर गिर्यारोहकांच्या सुविधेसाठी कुठेही शिड्या किंवा रेलिंग्ज उपलब्ध नाहीत, अशा आव्हानात्मक वाटेवरून कारवीने स्वतःची वाट काढत हे शिखर गाठले. तिचे वडील सारंग साळी आणि आजोबा बाळकृष्ण साळी (गरूड) यांचे तिला या मोहिमेत मार्गदर्शन लाभले.
एवढ्या लहान वयात दाखवलेले हे धाडस आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर कारवीने साळी समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल साळी समाज पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष विष्णू निचळ, ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’चे संपादक अनंत पांगारकर यांच्यासह सर्व समाजबांधवांकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे. कारवीच्या या कामगिरीने बाल गिर्यारोहकांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला असून, तिच्या भविष्यातील वाटचालीस समाजाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





