महिला दिन विशेष…
जागतिक महिला दिनाचा उत्सव साजरा होत असताना समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. संगमनेरच्या राजकीय पटलावर गेल्या डिसेंबरमध्ये एका तरुण, सुशिक्षित आणि धडाडीच्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. निवडणुकीच्या राजकारणात एकीकडे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेली महायुती शून्यावर बाद होण्याची स्थिती निर्माण झाली असताना अनपेक्षितपणे धक्कादायक निकाल समोर आला. या विजयातून जिने प्रस्थापितांना विचार करायला भाग पाडले आहे. त्या म्हणजे संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी. उच्च शिक्षणाची शिदोरी आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून समाजकारणात उतरलेल्या साक्षी सूर्यवंशी यांनी अत्यंत कमी कालावधीत महिलांच्या हक्कासाठी लढणारे एक विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून केवळ प्रभागातच नव्हे तर संगमनेरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
साक्षी सूर्यवंशी यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने थक्क करणारा आहे. मूळची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, केवळ पतीच्या समाजसेवेच्या ओढीपोटी त्यांनी राजकारणाचे ‘शिवधनुष्य’ पेलले. लग्नानंतर पती विनोद सूर्यवंशी यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कामात सक्रिय होताना त्यांना जनसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या वेदनांची जाणीव झाली. प्रशासकीय अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते, परंतु नियतीने त्यांना थेट लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या दरबारात बसविले. सामान्य कुटुंबातील महिला जेव्हा राजकारणात येते, तेव्हा तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, सासरकडील माजी नगरसेविका स्व. पारूबाई सूर्यवंशी यांचा वारसा आणि पतीचा खंबीर पाठिंबा या जोरावर त्यांनी ही आव्हाने पेलली आणि नगरपालिकेत आपला स्वतंत्र ठसा उमटवायला सुरुवात केली.
संगमनेर नगरपालिकेच्या राजकीय इतिहासात ज्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी वर्चस्व मिळवले होते, अशा प्रतिकूल परिस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला. आज त्या नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एकमेव विरोधी महिला नगरसेविका आहेत. सभागृहात जनतेचा प्रश्न मांडताना त्या सत्ताधाऱ्यांच्या बहुमताविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नागरिकांवर लादलेला अवाजवी कर असो किंवा गरिबांच्या पोटावर पाय देणारी अतिक्रमणाची कारवाई असो, साक्षी सूर्यवंशी यांनी नेहमीच अन्यायाविरोधात सामान्य माणसासोबत धाऊन जात आहे. त्यांची ही ‘एकलव्य’ वृत्ती आज अनेक महिला, तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
महिला सक्षमीकरणाबद्दल साक्षी सूर्यवंशी यांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि आधुनिक आहे. त्या मानतात की, भारतीय राज्यघटनेने महिलांना दिलेले समान अधिकार केवळ कागदावर राहू नयेत. आज महिला संरक्षण, प्रशासन आणि उद्योगाच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत, अशा वेळी त्यांच्याकडे केवळ सहानुभूतीच्या भावनेने न पाहता त्यांना संधी आणि सन्मान देणे काळाची गरज आहे. महिला आता ‘अबला’ राहिलेली नाही, तर ती ‘सबला’ बनून समाज परिवर्तनाचे केंद्र बनली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असो किंवा त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा विषय असो, त्या नेहमीच आग्रही भूमिका मांडतात. महिलांनी स्वतःच्या सामर्थ्याची ओळख पटवून घेत कौटुंबिक जबाबदारीसोबतच समाज कल्याणासाठी योगदान द्यावे, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त संदेश देताना साक्षी सूर्यवंशी असे आवाहन करतात की, हा दिवस केवळ औपचारिकता म्हणून साजरा न करता तो महिलांच्या सन्मानाचा संकल्प दिवस असावा. स्त्रियांना त्यांचे आकाश कवेत घेण्याची मोकळीक देणे आणि त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे, हीच खऱ्या अर्थाने त्यांना दिलेली मोठी भेट ठरेल. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, स्वप्नांचा पाठलाग करणारी प्रत्येक स्त्री आजच्या युगाची खरी नायिका आहे. साक्षी सूर्यवंशी यांचा हा संघर्षमयी आणि यशस्वी प्रवास केवळ एका नगरसेविकेची यशोगाथा नसून, तो एका सामान्य स्त्रीच्या असामान्य जिद्दीचा विजय आहे, येणाऱ्या पिढीला सदैव दिशा दाखवत राहील.





