संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने तपास करत या दोघा सराईतांना सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघेही राहणार नवघर गल्ली, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांनी दहशत माजवली होती, मात्र पोलीस त्यांच्या मागावर असतानाही ते सातत्याने गुंगारा देत होते. या आरोपींचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
शहर पोलिसांच्या पथकाला तपासादरम्यान हे आरोपी अहिल्यानगर जिल्हा सोडून सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुरंगवाडी येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. शहर पोलिसांच्या एका पथकाने तातडीने सांगली गाठले. संगमनेरपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
सध्या भिलवडी पोलीस ठाण्यात या अटकेबाबतची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पोलीस पथक आरोपींना घेऊन संगमनेरच्या दिशेने रवाना झाले आहे. संगमनेर शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे वाढते वर्चस्व मोडीत काढण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.





