संगमनेर शहरातील देवाचा मळा परिसरात दोन दिवसांपूर्वी शहर पोलिसांच्या पथकाने मोठी कारवाई करत गोरगरिबांना मिळणारे शिधापत्रिकेवरील रेशनचे धान्य पकडले होते. मात्र मोठ्या प्रमाणात कागदपत्र रंगविण्यात आल्यानंतर देखील या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी पकडलेल धान्य शासकीय मालकीचे होते की ते काळया बाजारात विक्रीसाठी जात होते याचा खुलासा न झाल्याने पुरवठा महसूल आणि पोलीस यांच्या संदर्भात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
संगमनेर शहरालगतच्या शहर आणि गुंजाळवाडी सीमेवर एका बड्या हॉस्पिटल जवळ पोलीस पथकाने केलेली ही कारवाई सुमारे सात-आठ तास सुरू होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन ट्रक, एक छोटा हत्ती (मिनी टेम्पो) आणि मोठ्या प्रमाणावर रेशनचे धान्य ताब्यात घेतले होते. याशिवाय एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले होते. धान्यासह ताब्यात घेतलेली ही वाहने तात्काळ पोलिसांनी पोलीस वसाहतीमध्ये आणून लावली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पकडलेल्या एका ट्रक मध्ये तब्बल २९५ तांदळाची पोती होती. तर दुसऱ्या वाहनात देखील आणखी काही तांदळाची पोती आणि मिनी टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात रिकामे बारदान आढळून आले. हे धान्य गरिबांच्या पोटातून काढून विक्रीसाठी काय बाजारात जात असल्याचा संशय होता. पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत यासंबंधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
बराच वेळ सुरू असलेल्या या कारवाईचा सुगावा लागल्यानंतर पोलीस ठाणे आणि महसूल कार्यालयाची शेजारचीच आडवी असलेली भिंत ओलांडून पुरवठा विभागाचे अधिकारी पोलीस ठाण्यात आले. आणि त्यांनी या पोलिसांनी पकडलेल्या धान्यावर दावा सांगितला असल्याची माहिती मिळते.
पोलिसांकडून संबंधित पकडलेले धान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केल्याचे समजत असून पोलिसांनी महसूलच्या या कारवाई संदर्भात संगमनेरकर नागरिकांमध्ये मात्र मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
पोलिसांनी पकडलेले धान्य जर शासकीय आणि अधिकृत होते तर ते रस्त्यामध्ये संशयास्पदरीत्या कसे आढळून आले. हे धान्य कुठून कुठे जाणार होते, शासकीय गोदामाऐवजी रस्त्यावर या मालाची अदलाबदली का केली जात होती, संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी का उपस्थित नव्हते. पोलीस कारवाई सुरू असताना देखील अधिकारी तेथे का आले नाही? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संगमनेर तहसीलच्या पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक रसिक सातपुते यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.
त्यामुळे या संदर्भात महसूल खात्याची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. यामुळे रस्त्यात अदलाबदली होणारे धान्य काळया बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा नागरिकांचा संशय गडद झाला आहे. तसेच पोलिसांनी कारवाई का टाळली या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालणार का असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.