संगमनेर, प्रतिनिधी-
पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या संगमनेर पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाका येथे मोठ्या शिताफीने आवळल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी व्यापाऱ्याची सुटका करत आरोपींकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून आरोपी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक UP-70-HR-9272) आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दिली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हिवरगाव पावसा टोलनाका येथे सापळा रचला. त्याचवेळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी खांडगाव फाटा येथे नाकाबंदी करून आरोपींची नाकेबंदी केली होती.
सोमवारी (९ मार्च) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित कार टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तिला चहुबाजूंनी वेढले. कारची झडती घेतली असता त्यामध्ये चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय ३४), दिलीप मोहनलाल सरोज (वय २८), रिंकू अलगुराम सरोज (वय १७), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय २६) आणि मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय २४) हे पाच आरोपी आढळून आले. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रांसह मोबाईल आणि कार हस्तगत करण्यात आली आहे.
या टोळीविरुद्ध पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १४०(१), १४०(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना पुढील तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बापूसाहेब हांडे, राहुल सारबंदे, सुनील ढाकणे, संतोष फड, शांताराम मालुजकर तसेच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने केली.





