संगमनेर, प्रतिनिधी-
संगमनेर तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात महार वतन इनाम जमिनीवर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या आईच्या पश्चात चिखली येथील महार वतन जमीन वारसा हक्काने त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असून, ती त्यांच्या सामायिक ताब्यात आहे. दरम्यानच्या काळात, चिखली ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार बांधकामाचा निधी मंजूर करून घेतला होता. या कामाचा ठेका चिखली येथील अरविंद सोमनाथ हासे आणि मंगळापूर येथील प्रतीक भाऊसाहेब भोकनळ या दोन ठेकेदारांना देण्यात आला होता.
नियमानुसार, वर्ग-२ च्या जमिनीचा ताबा घेताना किंवा तिचा शेतीव्यतिरिक्त वापर करताना जिल्हाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे कायदेशीररीत्या अनिवार्य असते. मात्र, संबंधित ठेकेदारांनी या नियमांचे उल्लंघन करत आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नियोजित जागी काम न करता, फिर्यादीच्या मालकीच्या खाजगी शेतजमिनीत कायमस्वरूपी बांधकाम करून मोठे नुकसान केले. या अनधिकृत अतिक्रमणाबाबत फिर्यादीने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. प्रशासकीय स्तरावर सातत्याने पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्याचे पाहून अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत संगमनेर शहर पोलिसांनी गेल्या शनिवारी (२८ फेब्रुवारी) रात्री आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ०१७८/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२४(४), ३२९(३) आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी) १९८९ चे कलम ३(१)(f) यांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
📌 ग्रामपंचायत हद्दीत खासगी क्षेत्रावर दलित वस्ती दाखवून ग्रामपंचायत आणि ठेकेदारांनी लाखो रुपयांचा शासन निधी पाण्यात घातला आहे. खासगी शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या संदर्भात वारंवार पंचायत समिती प्रशासन तहसीलदार शहर पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक यांची भेट घेतली. मात्र दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतल्यानंतर शहर पोलिसांनी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र 10-11 दिवसांचा कालावधी उलटून देखील गुन्हेगार अद्यापही मोकाट आहे. आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. – तक्रारदार महिला.





