संगमनेर, प्रतिनिधी-
कायदे, नियम आणि नीतिमत्ता यांचे पालन करणारा प्रत्येक जागरूक नागरिक हीच देशाची खरी ताकद असून, अशा नागरिकांच्या संघशक्तीच्या बळावरच भारत आज जागतिक महाशक्ती म्हणून उदयाला येत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते आणि चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
संगमनेर येथील राजस्थान युवक मंडळाच्या वतीने, मालपाणी उद्योग समूहाचे अध्वर्यु स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘मंथन’ व्याख्यानमालेचा समारोप ‘विकसित भारत आणि आपण सगळेच’ या विषयाने झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
धर्माधिकारी यांनी आपल्या व्याख्यानात राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकताना सांगितले की, देशालाच दैवत मानून प्रामाणिकपणे कार्य करणारे शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर आणि अभियंते हे घटक राष्ट्राची खरी संपत्ती आहेत. भारतीय जीवनपद्धतीचा पाया अध्यात्म असून समर्थ रामदास स्वामी आणि श्रीमद्भगवद्गीतेतील कर्मयोगाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने स्वतःपासून सकारात्मक कार्याची सुरुवात करणे आवश्यक आहे. प्रगतीच्या वाटेत भ्रष्टाचार हा मोठा अडथळा असून, ही कीड नष्ट करण्याचा निर्धार प्रत्येकाने करायला हवा.
तसेच, वैयक्तिक आरोग्याची जपणूक करणे हे देखील राष्ट्रहिताचेच कार्य असून त्यातूनच एक तंदुरुस्त आणि बलाढ्य भारत घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी धर्माधिकारी यांनी संगमनेरमधील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शिक्षण पद्धतीचा विशेष गौरव केला. भगवद्गीता आणि योगसाधनेच्या पायावर उभी असलेली ही शिक्षण प्रणाली आदर्श राष्ट्रभक्त पिढी घडवत असल्याचे सांगून, मालपाणी उद्योग समूह आणि डॉ. संजय मालपाणी यांच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी म्हणाले की, व्याख्यानमालांच्या परंपरेमुळे संगमनेरची पिढी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ झाली असून शहराची ओळख एक ‘सांस्कृतिक शहर’ म्हणून निर्माण झाली आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सलोखा टिकून राहतो आणि दिग्गज व्यक्तींच्या अनुभवातून नागरिकांना ज्ञानाची शिदोरी मिळते.
या कार्यक्रमाला मंडळाचे कार्याध्यक्ष सुमित अट्टल, मालपाणी परिवारातील सदस्य आणि संगमनेरमधील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित अट्टल यांनी केले, तर मुरारी देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सजग नागरिक हीच देशाची सर्वात मोठी शक्ती : अविनाश धर्माधिकारी
माधवलाल मालपाणी स्मृती ‘मंथन’ व्याख्यानमालेचा संगमनेरमध्ये शानदार समारोप





