आश्वी, प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा आपल्या दहशतीचा प्रत्यय दिला असून, आज सकाळी शेतात काम करणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, एकाच वस्तीवर बिबट्याने हल्ला करण्याची ही चौथी वेळ असल्याने वनविभागाच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्वी बुद्रुक येथील खेमनर वस्तीवरील गट नंबर २३१ मध्ये सुमनबाई बाळासाहेब खेमनर या आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जनावरांसाठी घास कापण्याचे काम करत होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने सुमनबाई यांच्या मानेवर आणि हातावर खोलवर जखमा केल्या.
संकटाच्या प्रसंगी सुमनबाई यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने त्यांचे पुत्र सुभाष खेमनर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेतली. जमाव येताना पाहून बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळे सुमनबाई यांचे प्राण वाचले असून, त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आश्वी आणि शिबलापूर परिसरात बिबट्यांचा वावर कमालीचा वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारीच शिबलापूर-आश्वी खुर्द रस्त्यावरील बोंद्रे वस्तीवर बिबट्याने ११ शेळ्यांचा फडशा पाडला होता. विशेष म्हणजे, वनविभागाचे कर्मचारी तिथे पिंजरा लावण्याची तयारी करत होते, तेव्हा दोन बिबट्यांमध्ये शिकारीवरून झालेली झुंज त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. यामुळे या परिसरात एकापेक्षा जास्त बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू असताना दिवसाढवळ्या होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. एकाच वस्तीवर वारंवार होणारे हल्ले रोखण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागाने या भागातील बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि ठिकठिकाणी पिंजरे लावून मानवी वस्तीत येणाऱ्या या हिंस्र प्राण्यांना जेरबंद करावे, अशी आग्रही मागणी आश्वी परिसरातील नागरिकांनी केली आहे.






