महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर:
जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा पारा आणि भारतीय हवामान खात्याने दिलेला उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी १८ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नव्या निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरवल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना या उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा बदल करण्यात आला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हे आदेश लागू करण्यात आले असून, शाळा व्यवस्थापन समित्यांनी या बदलाला मंजुरी देऊन तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयाची माहिती सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या वेळेत कपात करण्यात आली असली तरी, शिक्षकांसाठी मात्र स्वतंत्र सूचना जारी केल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे कामकाज आणि निकाल तयार करण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी शिक्षकांनी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.






