संगमनेर: “अध्यात्मिक श्रद्धेपोटी आपण ज्याप्रमाणे पवित्र मंदिरांना दान देतो, त्याच धर्तीवर उद्याचा सुजाण भारतीय नागरिक घडवणाऱ्या जीवन शिक्षण मंदिरांना म्हणजेच शाळांनाही सढळ हस्ते दान दिले पाहिजे. जर ही ज्ञानमंदिरे भक्कमपणे उभी राहिली, तरच आपला देश खऱ्या अर्थाने सामर्थ्यसंपन्न बनेल,” असे प्रतिपादन संगमनेर येथील प्रसिद्ध अंबिका मुळव्याध व भगंदर क्लिनिकचे संचालक डॉ. दत्तात्रय आहेर यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी (गणोरे) येथे आयोजित वृक्षारोपण व देणगी प्रदान समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर रोटरी क्लबचे संचालक सुनील कडलग, डॉ. रेखा आहेर, सरपंच संतोष आंबरे, मारुती आहेर, अशोक आहेर, राजेंद्र आंबरे, दिगंबर दातीर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांच्या हस्ते डॉ. दत्तात्रय आहेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आपल्या उत्पन्नातील काही वाटा समाजासाठी खर्च करून सामाजिक भान जपणे आणि माजी विद्यार्थी म्हणून शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे, याच भावनेतून डॉ. दत्तात्रय आहेर यांनी शिंदेवाडी शाळेच्या विकासकामांसाठी ५१ हजार रुपयांची भरीव देणगी जाहीर केली व सुपूर्द केली. माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक एकत्र आले, तर कोणत्याही शाळेचा कायापालट होऊ शकतो, हे शिंदेवाडी शाळेने संपूर्ण तालुक्याला दाखवून दिले असल्याचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मालपाणी नर्सरी यांच्याकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या वृक्षांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. केवळ वृक्षारोपण न करता, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाने एका झाडाचे पालकत्व स्वीकारून त्याच्या संगोपनाची कायदेशीर जबाबदारी घेतली आणि तशी शपथही घेतली.
या उपक्रमाचे कौतुक करताना शिक्षण विस्तार अधिकारी अनिल गायकवाड म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. भविष्यात जर आपल्याला सुखी आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल, तर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश प्रत्येकाने अंगीकारायला हवा.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका वृषाली कडलग यांनी शिंदेवाडी शाळेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आणि कायापालटाचा सविस्तर आढावा घेतला.
या सोहळ्यात शाळेला वस्तू स्वरूपात, रोख देणगी आणि विशेष निधीच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी अरविंद आहेर , राजाराम आहेर, शिक्षण तज्ञ दत्तात्रय हांडे, संतोष भालेराव, गणेश भालेराव, श्रीकांत खतोडे, विशाल आंबरे, रावसाहेब दातीर, आकाश आंबरे, योगेश दातीर, अशोक दातीर, दत्तात्रय आंबरे, सागर चव्हाण, गोरख आहेर, प्रवीण मालुंजकर, संजय आंबरे, विवेक दातीर, वाळीबा खतोडे, प्रियंका हांडे, सुवर्णा खतोडे, शितल आंबरे, अक्षदा आंबरे , प्रियंका आहेर, ज्योती आंबरे ,माया आंबरे,अनिता हांडे, मीनाक्षी हांडे, अश्विनी दातीर, उज्वला हांडे, संजीवनी दातीर, मोहिनी शिंदे आदींसह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका कल्पना पाटील मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
त्यानंतर हरितक्रांती उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड कार्यक्रम, व उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांना अनेक प्रकारच्या वृक्षांची रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या शाळेच्या शालेय पोषण आहाराचे काम करणाऱ्या अनिता हांडे यांच्याकडून त्यांच्या उपस्थित सर्वांना अल्पोपहार व खाऊचे वाटप करण्यात आले.